महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर जल' या घोषवाक्यानुसार पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू आहे. देशातील नळ पाणी पुरवठा योजनांची कार्यक्षमता सुधारणे आणि गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे या उददेशाने एक ते ३१ डिसेंबर यया कालावधीत 'स्वच्छ जल से सुरक्षा' हे अभियान राबविले सुरू आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली आहे.
'स्वच्छ जल से सुरक्षा' या अभियान अंतर्गत अस्तित्वातील सर्व नळ पाणी पुरवठा योजना व रेट्रोफिटिंग करण्यात येणा-या योजनांच्या प्रमुख स्त्रोतांचे तसेच नवीन योजनांकरीता स्त्रोतांचे काम पूर्ण झाले असल्यास अथवा स्त्रोत अस्तित्वात असल्यास 'हर घर जल' या ॲपद्वारे जीओ टॅगिंग पूर्ण करणे प्रत्येक नळ पाणी पुरवठा योजनेच्या रासायनिक व जैविक तपासणी, क्षेत्रीय पाणी परिक्षण संचाव्दारे पाणी तपासणी करण्यासाठी गावस्तरावर नियुक्त केलेल्या महिलांना प्रशिक्षण देवून पाणी गुणवत्ता तपासणी आदी कामे करण्यात येणार आहेत.
पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, ग्राम पंचायत विभाग आणि भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा या विभागांनी समन्वयाने कामे होणार आहेत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सरकारने दिलेल्या वेळापत्रकानुसार अंमलबजावणी करावी. तसेच, अभियान कालावधीमध्ये गावस्तरावरील पाणी नमुने तपासणीसाठी वेळेत प्रयोगशाळेत पोहचविणे व उपलब्ध क्षेत्रीय पाणी परिक्षण संचाव्दारे स्त्रोतांची तपासणी करणे याची खबरदारी ग्रामसेवक आणि जलसुरक्षक यांनी घ्यावी. या उपक्रमाचे सनियंत्रण तालुकास्तरावरून गटविकास अधिकारी यांनी करावे अशा सूचना सीईओ चव्हाण यांनी केल्या आहेत.