महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकात आतापासूनच शह, काटशह सुरू झाले आहेत. सरकारची ध्येयधोरणे, पक्षीय भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नेतेमंडळीवर जबाबदारी सोपविली आहे. भाजपच्या या फौजेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार पंकजा मुंडे, आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आदींचा समावेश आहे. भाजपाच्या या रणनितीला सक्षमपणे टक्कर देण्यासाठी काँग्रेसनेही नेते व प्रवक्ते मिळून पंधरा जणांची विशेष टीम केली आहे. यामध्ये अनुभवी आणि तरुण नेतेमंडळीचा समावेश आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख यांचाही समावेश आहे.
महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते सत्ताधाऱ्यांची बाजू नेटाने मांडत असतात. सत्ताधारी आघाडीशी निगडीत पक्षाचे आयटी सेलकडून विरोधी आघाडीतील नेते मंडळीविषयी समाजात संभ्रमावस्था निर्माण केला जातो. छायाचित्र,भाषणाचे व्हिडिओ यामध्ये छेडछाड करुन समाजात दिशाभूल करण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या खोटया प्रचाराला सडतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेसने पंधरा जणांची टीम तयार केली आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांचा समावेश आहे. प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजीत देशमुख, प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा मिळून एकूण पंधरा नेते मंडळीवर जबाबदारी सोपविली आहे. समन्वयाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्यवक श्रीनिवास बिक्कड यांच्याकडे आहे. या साऱ्या नेते मंडळींनी काँग्रेस पक्षाची भूमिका, ध्येयधोरणे जनतेसमोर मांडायची आहेत. विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे.