कोल्हापुरात वर्षभरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रम ! सूर्यकांत मांढरेंच्या सिनेमांचे मोफत प्रदर्शन ! !
schedule28 Jun 25 person by visibility 10 categoryसामाजिक

‘चित्रसूर्य’ कार्यक्रमातून जेष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या मराठी सिनेमातील आठवणींना उजाळा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे जुने मराठी सिनेमे प्रेक्षकांना मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. शिवाय कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.
कोल्हापूर येथे सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रम ‘चित्रसूर्य’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमल महाडिक, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, विभीषण चवरे, सूर्यकांत मांढरे यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी मांढरे कुटुंबांतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या ‘चित्रसूर्य’ कार्यक्रमात सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘चित्रसूर्य’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शाहू स्मारक, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमातील संहिता लेखन आणि संशोधन डॉ. सुवर्णा चवरे यांनी केले होते, संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले. निवेदन सीमा देशमुख आणि श्रीरंग देशमुख यांनी केले.
कार्यक्रमात सूर्यकांत मांढरेंनी सिनेमासाठी दिलेल्या योगदानाबाबत माहिती देण्यात आली. त्यांच्या निवडक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका, त्यांचे संवाद, आठवणी तसेच गमतीशीर अनुभव निवेदकांनी मांडले. ‘सांगते ऐका’, ‘भाऊबीज’, ‘मल्हारी मार्तंड’, ‘शिवाजी महाराज’, ‘मीठ भाकर’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘जय भवानी’, ‘वारणेचा वाघ’, ‘साधी माणसं’, ‘जय भवानी’, ‘थोरातांची कमळा’, ‘धन्य ते संताजी धनाजी’, ‘केतकीच्या बनात’ सिनेमांची माहिती प्रेक्षकांना झाली. तसेच त्यांच्यावर चित्रीत ‘आमचा गणपती’, ‘ये जवळी घे जवळी’, ‘रम्य अशा स्थानी’, ‘कोकीळ कुहू कुहू बोले’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘राजाच्या रंग म्हाहाली’, ‘पडला पदर खांदा’, ‘कधी शिवराय यायचे तरी’, ‘शंकरा करुणाकरा’, ‘बघत राहूदे तुझ्याकडे’, ‘आला वसंत ऋतू आला’ ही गाणी गायक मयूर सुकाळे, अभिषेक तेलंग, मधुरा कुंभार, शेफाली कुलकर्णी, पियुषा कुलकर्णी आणि कार्तिकी गायकवाड यांनी सादर केले.