आलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात दहा जुलैला सांगलीत मोर्चा
schedule28 Jun 25 person by visibility 29 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हिप्परगी आणि आलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात दहा जुलै २०२५ रोजी सांगली पाटबंधारे विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे असे आमदार सतेज पाटील व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. या मोर्चाच्या नियोजनासंबंधी शुक्रवारी (२७ जून) कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आंदोलनाची माहिती दिली. दहा जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता सांगली पाटबंधारे विभाग कार्यालयावर मोर्चा निघणार आहे.
आमदार अरुण लाड, माजी आमदार उल्हास पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले,‘महापूर नियंत्रणासाठी उपलब्ध पैशांचे वाटोळे केले जात आहे. आलमटटी धरण, हिप्परगी धरणाची उंची, महापूर यासंबंधी सरकार गांभीर्याने घेत नाही. महापुराचा फटका हजारो नागरिकांना बसतो. महाराष्ट्र सरकारने कणखर भूमिका घेतली पाहिजे. ’
आमदार अरुण लाड म्हणाले, ‘आलमटटी धरणाचे पाणी २००५ पासून अडविण्याचे काम सुरू आहे. यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसत आहे. या विषयाकडे वारंवार लक्ष वेधूनही सरकार दुर्लक्ष करत आहे.’ माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘जागतिक बँकेकडून पैसे मिळतात, म्हणून गटारी साफ केल्या जात आहेत. महापूर नियंत्रणासाठीचा निधी कोठे खर्च केला हे जाहीर करायला हवे. नदीतील अडथळे दूर केले पाहिजेत. आलमट्टी आणि हिप्परगी धरणामुळे पाणी साचते. पुराचे पाणी प्रवाहित राहत नाही. यासंबंधी कोणतेही नियोजन सरकारकडे दिसत नाही.’