जिल्ह्यातील पन्नास हजार घरकुलांचे काम २६ जानेवारीपर्यत पूर्ण होणार-पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule19 May 25 person by visibility 39 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हजार घरकुलांचे काम येत्या २६ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उद्धिष्टपूर्तीनंतर तपोवन, मैदान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरकुलांच्या चाव्या लाभार्थ्यांना वितरित केल्या जातील.’असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जाहीर केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने अर्जुनवाडा येथे महिला व आवास योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, तहसीलदार अनिता देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद भामरे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, नाबार्डचे आशुतोष जाधव, गटविकास अधिकारी संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटांना समुदाय गुंतवणूक निधी, अवजार बँक, उत्पादक गट व समाज कल्याण विभागांतर्गत पावर टिलर आणि रोटावेटर, मागासवर्गीय महिला बचत गटांना आधुनिक यंत्रसामग्री पुरवण्यासाठी एकूण २४ कोटी पन्नास लाख रुपयांचे कर्ज व अनुदान वितरण करण्यात आले.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले ‘ कुटुंबाच्या प्रगतीसाठी, तसेच सर्व महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी बचत गटांच्या चळवळीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्टया सक्षम होतील. भविष्यात चांगले काम करणाऱ्या बचत गटांना पुरस्कार व सन्मान देऊन गौरविण्यात येईल. ’ प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी सांगितले की, जिल्ह्यात २५,५९९ स्वयंसहायता समूह गट आहेत. १,२७७ ग्राम संघ, ६७ प्रभाग संघ असून १,४४८ समुदाय संसाधन व्यक्ती आणि २५,४८८ वैयक्तिक व सामूहिक व्यवसाय सक्रिय आहेत. बँक पतपुरवठा गट १,१४३ असून, ४२३ कोटी रुपयांचा बँक पतपुरवठा करण्यात आला आहे. आनंदा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी आभार मानले.