पुण्यातून आमदार-सांगलीचा पालकमंत्री असलो तरी कोल्हापूरच्या विकासाला फर्स्ट प्राधान्य –मंत्री चंद्रकांत पाटील
schedule19 May 25 person by visibility 295 categoryउद्योग

शेतमालाच्या कचऱ्यापासून इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्नशील, ५०० कोटीचा गॅस-सिलिंडर रिफिलिंग सेंटर कोल्हापुरात सुरू करणार
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूरच्या गतीमान प्रगतीसाठी विकास प्रकल्पांचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. २०१४ ते २०१९ या कालावधीत कोल्हापूर विमानसेवेला भरारी दिली. कोल्हापूरवर लादलेला अन्यायकारक टोल रद्द केला. आताही उद्योगधंद्यासाठी कमी दरात वीज पुरवठा, सर्किट बेंचची स्थापना, मंदिर विकास आराखडा, आयटी पार्क विकसित करणे अशा विकास प्रकल्पावर फोकस ठेवून काम केले पाहिजे. ’ असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ‘मी पुण्यातून आमदार झालो, सांगलीचा पालकमंत्री असलो तरी कोल्हापूरच्या विकासाला फर्स्ट प्राधान्य राहील.’अशी ग्वाही त्यांनी दिली.
शाश्वत आणि सर्वांगिण विकास हे ब्रीद घेऊन स्थापन केलेल्या ‘कोल्हापूर फर्स्ट’ या संस्थेच्या कार्यालय उद्घाटन सोमवारी (१९ मे २०२५) करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ताराबाई पार्क येथील हिम्मतबहाद्दर परिसर येथे हा कार्यक्रम झाला. ‘कोल्हापूर फर्स्ट’मध्ये विविध क्षेत्रात आघाडीवर काम करणाऱ्या १८ संस्थांचा समावेश आहे.
‘आयटी पार्कसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आयटी पार्कमध्ये किती कंपन्या गुंतवणूक करायला तयार आहेत, कोणत्या मोठया कंपन्या उत्सुक आहेत यासंबंधीची यादी मला द्या, संबंधित कंपन्यांशी मी स्वत : बोलतो. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासह कोणताही उपद्रव होणार नाही याची खबरदारी घेऊ.’अशी ग्वाही देत मंत्री पाटील म्हणाले,‘ लहान लहान विकास प्रकल्प कोल्हापुरात सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापुरात लवकरच ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा गॅस रिफिल सिलिंग प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी २५ एकर जागेची आवश्यकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जागेसंदर्भात सूचना केल्या आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शेतमालापासून इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासंबंधी चर्चा झाली आहे. ’
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘कोल्हापूरच्या विविध संस्था एकवटल्याने विकासाला चालना मिळणार आहे. जिल्हयाच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहेत, त्याची पूर्तता सरकारच्या माध्यमातून केली जाईल. त्याद्वारे कोल्हापूर फर्स्ट संकल्पना साकार होईल.’ कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन म्हणाले, ‘कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी हवी. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर विकास व जोतिबा मंदिर विकास आराखडामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. आयटीपार्क, सर्किट बेंचसह विविध विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद आयोजित करावी.’या प्रसंगी संस्थेची नोंदणी प्रक्रियेचे काम पूर्ण केल्याबद्दल आयसीएसआय कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष जयदीप पाटील, माजी अध्यक्ष पद्मसिंह पाटील, सचिन बीडकर आदींचा सत्कार करण्यात आला. ग्राफिफ डिझायनर जयदीप मोरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला क्रीडा प्रतिष्ठानचे बाळ पाटणकर, हॉटेल मालक संघटनेचे उज्ज्वल नागेशकर, इंजिनीअरिंग असोसिएशनचे कमलाकांत कुलकर्णी, बाबासो कोंडेकर, उद्योजक मोहन कुशिरे, स्वरुप कदम, शारंग जाधव, हरिश्चंद्र धोत्रे, विश्वजीत देसाई, अजय देशपांडे, अजय कोराणे, श्रीकांत दुधाने दिनेश बुधले, अतुल पाटील, बदाम पाटील, प्रदीप कापडिया, सचिन शानबाग, डॉक्टर आर एम कुलकर्णी, बळीराम वराडे, संजय गांधी, सचिन सावंत, डॉ. अमोल कोडोलीकर, बार असोसिएशचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील, अॅडव्हान्टेज कोल्हापूरचे संकल्पक राजू एस. माने, भाजपाचे राहुल चिकोडे , कोल्हापूर फर्स्टचे पीआरओ विकास जगताप आदी उपस्थित होते. प्रा. क्षितीजा ताशी यांनी सूत्रसंचालन केले. कोल्हापूर फर्स्टचे सहसमन्यवक अॅड. सर्जेराव खोत यांनी आभार मानले.