राज्य सरकार नांदणी मठासोबत, महादेवी हत्तीणसाठी सुप्रीम कोर्टात जाणार : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक
schedule05 Aug 25 person by visibility 286 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘नांदणी मठातील महादेवी हत्तीण परत आली पाहिजे ही साऱ्यांचीच ईच्छा आहे. गेल्या ३४ वर्षापासून नांदणी मठात महादेवी हत्तीणचे वास्तव्य आहे. हत्तीणच्या निगराणीसाठी डॉक्टरांचे पथक नेमू. महत्वाचे म्हणजे महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी राज्य सरकार नांदणी मठासोबत आहे. नांदणी मठाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी, राज्य सरकारही याचिका दाखल करेल.’अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नांदणी मठ येथील महादेवी हत्तीण वनतारा येथे नेण्यात आली. या हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापुरात आंदोलने सुरू आहेत. नागरिक रस्त्यावर उतरले. दरम्यान याविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गणेश नाईक, मंत्री गिरीश महाजन, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विश्वजीत कदम, आमदार अमल महाडिक, आमदार अशोक माने, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार प्रकाश आवाडे, जैन अल्पसंख्यांक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी सहभागी होते. नांदणी मठाचे महास्वामी यांची बैठकीला उपस्थिती होती. यावेळी महादेवी हत्तीणला परत आणण्यासंबंधी चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘राज्य सरकार ताकतीने नांदणी मठासोबत आहे. महादेवी हत्तीण परत आली पाहिजे ही साऱ्यांची भूमिका आहे. ल.’असे सांगितले. या बैठकीसंबंधी पत्रकारांना माहिती सांगताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी राज्य सरकार मध्यस्थी करणार आहे. महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी सरकार मठासोबत असल्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.
बैठकीनंतर माजी खासदार राजू शेट्टी व आमदार सतेज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘महादेवी हत्तीणच्या आठ अहवालामध्ये ती फिट असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पेटा आणि वनतारा संस्थेची भूमिका संशयास्पद आहे. महादेवी हत्तीणच्या आजाराचा बनाव करुन वनताराला नेले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकार नांदणी मठासोबत असल्याचे म्हटले आहे. महादेवी हत्तीण परत येईपर्यंत आमचा लढा सुरू राहील. सीमाभागातील आणखी तीन हत्ती वनताराला नेणार असल्याचे समजते. त्या साऱ्याला आमचा विरोध आहे. विविध मठांशी संबंधित या हत्ती येथील संस्कृती, धार्मिक उत्सवाचा भाग आहेत. ’ दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीला मठाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसाद खोबरे, सागर शंभूशेटे, स्वस्तिक पाटील आदी उपस्थित होते.