कोरगावकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी रंगविली आठवणींची भिंत
schedule21 Jun 25 person by visibility 199 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शाळा म्हणजे केवळ शिक्षण घेण्याचे स्थान नसून ती विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील घडामोडीचे, आठवणीचे आणि संस्कारांचे माहेरघर असते. अशा या शाळेचे काहीतरी ऋण फेडण्याच्या भावनेतून सदर बाजार, विचारे माळ येथील कोरगांवकर हायस्कूलच्या १९८९ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी एक आगळा-वेगळा समाजप्रेरक उपक्रम राबवत आपल्या शाळेची रंगरंगोटी केली. माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत सुमारे पाच लाख रुपये खर्चून शाळेला पुन्हा एकदा तेज आणले जात आहे. उद्योजक मारूती माने यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
कोरगांवकर हायस्कूलची इमारत जुनी असल्याने रंगकामाअभावी भिंती खराब झाल्या होत्या. वर्ग खोल्या सुशोभित करण्याची आवश्यकता होती. मारूती माने यांनी १९८९ च्या बॅचमधील सुमारे १५ ते २० माजी विद्यार्थी एकत्र केले. त्यांनी शाळेचे आपल्यावर उपकार आहेत, आता तीच आपली जबाबदारी आहे या भावनेतून एकत्र येत शाळेच्या रंगसंगतीचा हा उपक्रम सुरू केला. शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते वर्गखोल्यापर्यंत रंगरंगोटी सुरू केली आहे. भिंतीवर शैक्षणिक व सामाजिक संदेश देणारी चित्रे तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी महापुरूषांच्या प्रतिमा साकारणार आहेत.
हा उपक्रम केवळ एक रंगकाम नाही तर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून राबविलेले पाऊल आहे. प्रत्येकाने आपल्याला जमेल तशी मदत केली. माजी विद्यार्थ्यांनी वेळ काढून शाळेच्या या उपक्रमात योगदान दिले, असे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी सांगितले. पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. अशा प्रकारचे उपक्रम शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवतात. विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करतात, असे मत व्यक्त केले.
माने यांच्यासह अनिल पन्हाळकर, राजू कुरणे, सतीश माने, महेश सपाटे, अरूण जाधव, प्रल्हाद तोरस्कर, राजेंद्र बनसोडे, प्रमोद मोरे, राजू विटेकर, बाळासाहेब निर्मळे, भगवान गायकवाड, रमेश भोसले, संजय भोसले, राजू जाधव, सतीश सुर्यवंशी, शशिकांत राजमाने, तानाजी शिंदे आदीसह इतर माजी विद्यार्थ्यांनी योगदान दिले.
.......................
कोरगांवकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी राबवलेला हा उपक्रम केवळ रंगकामापुरता मर्यादीत नाही. तर आमचे शाळेविषयी असलेले प्रेम, आपुलकी, जबाबदारी आणि सामाजिक जाणिवेचं प्रतीत आहे. आजच्या पिढीला हे दाखविण्याची गरज आहे की शिक्षण संपल्यावरही शाळेचे आपल्यावर ऋण असते. त्या ऋणाची परतफेड फक्त आर्थिक मदतीतच नाही तर समाजासाठी काहीतरी चांगले करूनही करता येते.
मारूती माने (माजी विद्यार्थी)
......................................