चार किलोमीटर अंतराचा प्रभाग, २५ हजाराहून अधिक लोकसंख्या! खरी कसोटी उमेदवारांची, मतदारांचा घ्यावा लागणार शोध!!
schedule04 Sep 25 person by visibility 119 categoryमहानगरपालिका
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका होत आहे. यामुळे पक्षीय पातळीवरील निवडणुकीला बळकटी मिळणार आहे. चार सदस्यीय प्रभागात किमान २५ हजार लोकसंख्या आहे, आणि प्रभागाचा परिघ चार किलोमीटर अंतराचा आहे. यामुळे या मतदारांपर्यंत पोहोचणे हीच खरी उमेदवारांसाठी कसोटी आहे. गावठाण व मध्यवस्तीतील प्रभाग वगळता उपनगरातील प्रभागातील मतदारांचा शोध घेताना उमेदवारांची दमछाक होणार आहे.
महापालिकेचे एकूण ८१ प्रभाग आहेत. या प्रभागांची विभागणी २० प्रभागात झाली आहे. एक ते १९ प्रभाग हे प्रत्येकी चार सदस्यीय आहेत. तर वीस क्रमांकांचा प्रभाग हा पाच सदस्यीय आहे. यामुळे एका प्रभागावर आता भिस्त ठेवून उमेदवारांना चालणार नाही. चारही प्रभागाशी संपर्क हवा, उत्तम नेटवर्क हवे. तरच मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य आहे. यापूर्वी एकसदस्यीय प्रभाग रचनेमुळे अनेकांची मक्तेदारी निर्माण झाली होती. वर्षानुवर्षे तेच त्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. आता मात्र या पद्धतीला पूर्णपणे चाप बसणार आहे.
पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्याशिवाय आता पर्याय उरला नाही. पहिले कारण म्हणजे, पक्षाला मानणारा एक वर्ग असतो. मतदार असतात. दुसरे कारण म्हणजे चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रत्येकाला ‘एकमेका सहाय्य करु,’चा नारा द्यावा लागणार आहे.‘चोरी –चोरी छुपके छुपके’कोणी व्यक्तीगत अजेंडा राबविला तर हक्काचा मतदारसंघ वगळता अन्य तीन वॉर्डात फटका बसू शकतो. यामुळ साऱ्यांनाच पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागणार आहे.
गावठाणमधील प्रभाग वगळता उपनगरातील प्रभाग हे विखुरले आहेत. या प्रभागातील अतंर तीन ते चार किलोमीटर होऊ शकते. प्रत्येक मतदारापर्यंत सगळया उमेदवारांनी पोहोचणे, संपर्क साधण्यासाठी पायाला भिंगरी बांधावी लागणार आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, उत्तरेश्वर पेठ, जुना बुधवार पेठ, राजारामपुरी, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, संभाजीनगर हा परिसर दाट लोकसंख्येचा. काही ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. काही अपार्टमेंटमधील मतदारांची संख्या शेकडो आहे. दरम्यान प्रभाग रचनेत यातील काही भाग फुटले आहेत. यामुळे ठराविक भागावर हुकूमत असणाऱ्या उमेदवारांना आता नव्या प्रभागात मतासाठी संपर्क वाढवावा लागणार आहे. कसबा बावडा, कदमवाडी, सदरबाजार, लाइनबाजार, राजेंद्रनगर, सुभाषनगर, रामानंदनगर, जरगनगर, रायगड कॉलनी, जुनी मोरे कॉलनी, देवकर पाणंद, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, फुलेवाडी रिंगरोड, मीराबाग, लक्षतीर्थ वसाहत हा सारा भाग उपनगरांनी जोडलेला. कॉलन्या विखुरलेल्या. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे एकंदरीत प्रभागाचे अंतर तीन –चार किलोमीटर अंतरापर्यत वाढलेले. यामुळे उमेदवारांना मतदारांचा शोध घ्यावा लागणार आहे.
………………….
प्रभाग व लोकसंख्या पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक एक – २७९७१, प्रभाग क्रमांक दोन -२५७१७, प्रभाग क्रमांक ३ – २५३५७, प्रभाग क्रमांक चार -२८५४६, प्रभाग क्रमांक पाच – २८५०३, प्रभाग क्रमांक सहा – २५३९४, प्रभाग क्रमांक सात -२५८६१, प्रभाग क्रमांक आठ – २७१३६, प्रभाग क्रमांक ९ – २७६२०, प्रभाग क्रमांक दहा -२८०६९, प्रभाग क्रमांक ११ -२७६२३, प्रभाग क्रमांक बारा -२६५२९, प्रभाग क्रमांक तेरा – २८५७१, प्रभाग क्रमांक चौदा – २६९८०, प्रभाग क्रमांक १५ – २७१३७, प्रभाग क्रमांक सोळा – २६४८९, प्रभाग क्रमांक सतरा -२७४४२, प्रभाग क्रमांक अठरा – २८३६४, प्रभाग क्रमांक १९ -२७९८३, प्रभाग क्रमांक २० -३२१२१ लोकसंख्या.