महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गेली ३०-३५ वर्षेआम्ही दोघेही राजकीय संघर्ष करताना एकमेकांच्या विरोधात लढलो. मात्र; माझ्या पडत्या काळात भावाप्रमाणे आमदार हसन मुश्रीफ यांनी साथ दिली. त्यांच्या सहकार्यामुळेच अन्नपूर्णा साखर कारखाना उभा राहिला आहे, हे मी नम्रपणे मान्य करतो. म्हणूनच; माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांना साथ देऊ, असे भावनिक वक्तव्य माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.
कागल तालुक्यातील हणबरवाडी येेथे जलजीवन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ, तसेच इतर चार कोटी, ८७ लाख रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटन झाले. याप्रसंगी घाटगे बोलत होते. आमदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी घाटगे म्हणाले, “आमदार मुश्रीफ यांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला. प मात्र; आज कोणीतरी येऊन शुभारंभाचे नारळ फोडत आहे. हे मूर्खपणाचे लक्षण आहे.”
आमदार मुश्रीफ म्हणाले, 'आपल्या मतदारसंघात २०० किलोमीटरच्या पानंदीसुद्धा डांबरीकरणाने पूर्णत्वाकडे गेल्या आहेत. मुख्य सर्व रस्ते तर झालेच. याशिवाय; गल्लीबोळातील रस्ते सुद्धा करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. संजय घाटगे यांनी आपल्याला साथ देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या साथीने जिल्ह्याचे राजकारण करू.”
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सूर्याजी घोरपडे, मारुतराव चोथे, शामराव पाटील, शिरसाप्पा खतकले, सोनूसिंग घाटगे, परशुराम शिंदे, विलास खोत, उत्तम साळवी, मारुती पोवार, ग्रामपंचायत सदस्य विशाल डाफळे, राणी नाईक,प्रांजली ढोपे, पिरगोंडा नाईक, परसू नाईक आदी उपस्थित होते. प्रताप खोत यांनी प्रास्ताविक केले.
.............................