सतेज पाटलांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांचे प्रीतीभोजन, खुलेपणाने रंगली राजकारणावर चर्चा !
schedule11 May 25 person by visibility 889 categoryमहानगरपालिका
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : विधानसभा निवडणुकीपासून अस्वस्थता असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांत पुन्हा एकदा एकसंधपणा साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. कळंबा येथील स्नेहभोजन होऊन पंधरा दिवस होण्यापूर्वीच पुन्हा एकदा काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये प्रीतीभोजन झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी (१० मे ) झालेल्या या बैठकीत नगरसेवकांनी मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. खुलेपणाने राजकारणावर चर्चा झाली. या बैठकीला तीसहून अधिक माजी नगरसेवकात उपस्थित होते. त्या साऱ्यांनी सतेज पाटील यांच्यासोबत कायम राहण्याची ग्वाही दिली. विधानसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या दुरुस्त करुन आगामी निवडणूक ताकतीने लढविण्याचा व जिंकण्याचा निर्धारही झाला. माजी नगरसेवकाचे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात हॉटेल आहे, त्या ठिकाणी सगळे एकवटले होते.
काँग्रेसचे दहा ते बारा नगरसेवक शिवसेनेच्या वाटयावर असल्याच्या चर्चा वेगावली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नगरसेवकांतही अंतर्गत धुसफूस पाहावयास मिळाली. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी, माघारी नाटय, नगरसेवकांची सह्यांची मोहिम या साऱ्याची किनार त्या पाठीमागे आहे. नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी नगरसेवक एकसंध आहेत, हे दर्शविण्यासाठी डिनर डिप्लोमसी सुरू आहे. दोन आठवडयापूर्वी कळंबा-गारगोटी रोडवरील हॉटेलमध्ये स्नेहभोजन झाले होते. त्यानंतर शनिवारी, दहा मे रोजी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नगरसेवकांसाठी प्रीतीभोजन आयोजित केले होते.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, स्थायी समितीचे माजी सभापती संदीप नेजदार, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, प्रतापसिंह जाधव, राहुल माने, श्रावण फडतारे, माधुरी लाड, प्रविण केसरकर, मधुकर रामाणे, इंद्रजीत बोंद्रे, लाला भोसले, भूपाल शेटे, वृषाली दुर्वास कदम, दीपा मगदूम, प्रतिक्षा धीरज पाटील, वनिता देठे, रिना कांबळे, छाया उमेश पोवार, शोभा कवाळे, जय पटकारे, तौफिक मुल्लाणी, शिवानंद बनछोडे आदी उपस्थित होते. याशिवाय गेल्या काही महिन्यापासू काँग्रेससोबत आलेले माजी नगरसेवक ईश्वर परमार, राजाराम गायकवाड, अश्विनी बारामते, रियाज सुभेदार, भैय्या शेटके उपस्थित होते.
मनमोकळा संवाद…आम्ही सगळे तुमच्यासोबत
नगरसेवकांनी, या बैठकीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांना आमंत्रित केले होते. या दरम्यान काही नगरसेवकांनी, विधानसभा निवडणुकीतील घडामोडी, माघारी नाट्य, उमेदवारी डावलणे, सहयांची मोहिम याविषयी मोकळयापणाने भावना व्यक्त केल्या. विधानसभा निवडणुकीतील घडामोडीतून नगरसेवकांत धुसफूस वाढत गेल्याचे निदर्शनास आणले. यावर आमदार सतेज पाटील यांनी, काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने निवडणूक ताकतीने लढविली होती. राज्यभर आपल्या यंत्रणा कार्यरत होत्या. कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रसह राज्यातील विविध भागाची जबाबदारी आपल्यावर होती. त्या साऱ्यात आपण व्यस्त होतो. मात्र निवडणुकीचा निकाल सगळा अनपेक्षित होता. जिल्ह्यातही विचित्र स्थिती होती. या स्थितीत मी, प्रत्येकाला फोन कसा करायचा ? मी, प्रत्येकाला भेटायला जायचे की तुम्ही येऊन मला भेटायचे ! असा मुददा मांडताच बैठकीचे वातावरण भावनिक बनले. यावर उपस्थित नगरसेवकांनी आम्ही सगळे तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.
………….
पदाचा पॅटर्न अन् हास्याची खसखस….
नगरसेवकांनी खुलेपणाने मते व्यक्त केली. चेष्टामस्करी रंगली. या खुलेपणाने रंगलेल्या संवादात एका नगरसेवकाने महापालिकेत पद वाटपाचा फॉर्म्युला काय होता ? अशी विचारणा केली. त्यावर, ‘ज्यांनी मटणाचा डबा दिला, त्यांना पदे दिली. तुम्ही दिला नाही त्यामुळे बाजूला राहिला’असे मिश्किल उत्तर देताच बैठकीत हास्याची खसखस पिकली. दरम्यान आता महिन्यातून एकदा सगळे नगरसेवक एकत्र येण्याचे ठरले. पुढील बैठकीला माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील यांना आमंत्रित करण्याचे ठरले.
………………..
देशमुख, आजरेकर दूरच ! पोवार, नाईकनवरे अनुपस्थित
काँग्रेसचे काही नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाणार आहेत, त्या अनुषंगाने घडामोडी सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीपासून दुरावलेले स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर, देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर हे शनिवारच्या बैठकीपासून दूरच होते. माजी नगरसेवक अशोक जाधव, दिलीप पोवार, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे हे सुद्धा बैठकीला उपस्थित नव्हते. नाईकनवरे हे लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस सोबत होते.