मंत्री खासदारांसह केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार ! कोल्हापूर वैभववाडी प्रकल्प कामाला गती मिळावी - सुरेंद्र जैन
schedule05 Feb 26 person by visibility 19 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर –वैभववाडी प्रस्तावित रेल्वे प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्राच्या विकासातील महत्वाचा टप्पा ठरणार आहे. या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळावी यासाठी फेब्रुवारी २०२६ मध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहोत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातील लोकप्रतिनिधी सोबत केंद्रीयमंत्री वैष्णव यांना भेटणार आहे.’ अशी माहिती कोल्हापूर फर्स्टचे समन्यवक सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर –वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे प्रकल्प हा ६५०० कोटी रुपयांचा आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांचा वाटा प्रत्येकी पन्नास टक्के इतका आहे. यापैकी ३२४४ कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय बजेटमध्ये झाली आहे. या प्रकल्पासंबंधी अधिक माहिती देताना कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक जैन म्हणाले, ‘हा रेल्वे प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह दक्षिण भारताला जोडणारा आहे. गेल्या चार दशकांपासून या रेल्वे प्रकल्पाची मागणी आहे. कोल्हापूर फर्स्टने सुद्धा विकासाचाा अजेंडा मांडताना कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे, कोल्हापुरात आयटी पार्क प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. या प्रकल्पासाठी अनेक घटकांनी प्रयत्न केले आहेत. माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी, पुढाकार घेत पहिल्यांदा २०१६ मधील रेल्वे अर्थसंकल्पातया प्रकल्पाचा समावेश केला. पुढे खासदार धनंजय महाडिक यानी या प्रकल्पाचा पीएम गतीशक्ती योजनेत समावेश करुन अधिक भक्कम स्वरुप दिले. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज, खासदार महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्याचे नियोजन केले होते. या प्रकल्पासाठी खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कोल्हापूर फर्स्टच्या शिष्टमंडळाने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांनीही केंद्राकडे पाठपुरावा अशी विनंती केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा पन्नास टक्के आर्थिक सहभाग मान्य केला आहे. यामुळे प्रकल्पाला गती मिळणार असल्याचे जैन यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या साऱ्यांचा कोल्हापुरात नागरी सत्कार करण्याचे नियोजन आहे. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी अशी मागणी केली जाणार असल्याचे जैन म्हणाले. या महिन्यातच एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. पत्रकार परिषदेला इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, बाबासो कोंडेकर, प्रताप कोंडेकर, जयदीप चौगुले, शांताराम सुर्वे,डॉ. गिरीश वझे, नितीन वाडीकर, जयदीप पाटील आदी उपस्थित होते