विद्यार्थिनींच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ उभारू या : डॉ. जगन्नाथ पाटील
schedule27 Jul 26 person by visibility 31 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या पर्यावरणप्रेमाच्या संदेशाला आषाढी एकादशीला कृतीची जोड देत शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात 'मिशन एंजल फॉर अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट या पर्यावरण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी पृथ्वीदूत म्हणून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. राधानगरी तालुक्यातील तिटवे येथे कार्यक्रम झाला.
यावेळी आशिया पॅसिफिक क्वालिटी नेटवर्कचे अध्यक्ष तथा जागतिक शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरण संरक्षणाची जागतिक चळवळ उभी राहू शकते, असा विश्वास व्यक्त केला. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले. उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या घराजवळ, शेतात किंवा परिसरात किमान दहा वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. तसेच दुर्मिळ वृक्षांचे संरक्षण, प्लास्टिकमुक्त जीवनशैली, हरित ऊर्जेचा वापर, जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याची प्रतिज्ञा घेतली.
विद्यार्थिनींनी लावलेल्या प्रत्येक वृक्षाची जिओ-टॅगिंगद्वारे ऑनलाइन नोंद ठेवून त्याच्या संवर्धनावर नियमित लक्ष ठेवले जाणार असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थिनींचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.कार्यक्रमात विद्यार्थिनींना मोफत वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थिनीने मिळालेल्या वृक्षाचे संगोपन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. तेजस्विनी परबकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी अनिल पाटील,उपप्राचार्य प्रा. सागर शेटगे उपस्थित होते.