महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
राजाराम कारखान्याची निवडणूक रंगात आली असताना मंगळवारी रात्री एक खळबळ जनक प्रकार उघडकीला आला आहे विरोधी आघाडीच्या वीस ते पंचवीस जणांनी रात्रीच्या अंधारात कारखान्यात जबरदस्ती घुसून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या सुरक्षारक्षकांना दमदाटी करून घुसलेल्या विरोधकांनी केलेला हा प्रकार निंदनीय आहे अशी टीका अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली. लोकशाहीच्या आणि नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या विरोधकांनी काल मात्र आपले खरे रूप दाखवून दिले. राजाराम कारखाना कार्यस्थळावर रात्री अकराच्या सुमारास कारखान्याचे प्रमुख कार्यालय फोडून कागदपत्रे लंपास करण्याचा त्यांचा बेत होता असा आरोप अध्यक्ष पाटील यांनी केला. सुरक्षारक्षकांनी आरडाओरडा करताच त्यांना आल्या पावली धुम ठोकावी लागली. एक प्रकारे निवडणुकीपूर्वीच कारखान्यावर दरोडा टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय . मुद्दाम सुट्टीच्या दिवशी आणि रात्री अपरात्री येऊन कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये दहशत वाजवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले.सभासदांच्या हक्काची भाषा करणाऱ्या विरोधकांनी लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जायला हवं होतं पण आपला पराभव समोर दिसत असल्याने विरोधक आता गुंडगिरीवर उतरले आहेत अशी टीका अध्यक्ष पाटील यांनी केली. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी राजाराम कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि शिष्टमंडळ जिल्हा पोलीस प्रमुखांची सायंकाळी सहा वाजता भेटणार आहे.