लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!
schedule19 May 26 person by visibility 116 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. हा गरज नसलेला महामार्ग आहे, दरम्यान सरकार व प्रशासनाने पोलिसांच्या आडून शेतकऱ्यांवर कारवाईचा प्रकार झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. अरेला कारे म्हणण्याची ताकत महाराष्ट्रात आहे, हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाच्या लढयाची धार आणखी तीव्र करण्यासाठी नऊ जून २०२६ रोजी कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘न भूतो…न भविष्यती’असा मोर्चा काढला जाईल. कोल्हापूरच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वाधिक मोठा मोर्चा ठरेल.’अशा शब्दांत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात मंगळवारी, १९ मे २०२६ रोजी सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी मेळावा आयोजित केला होता. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार संतपराव पवार पाटील, माज आमदार के.पी. पाटील, माजी आमदार राजू आवळे, माजी आमदार राजीव आवळे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटी सभागृहात झालेल्या या मेळाव्यात बोलताना सर्वच नेत्यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला. या मेळाव्यात आमदार पाटील यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. पाटील म्हणाले, ‘रस्त्यावरील लढाईसोबतच तांत्रिक लढाई सुद्धा ताकतीने करावी लागणार आहे. यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधात येत्या २२ मेपर्यंत जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात. २५ मे २०२६ पर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत आहे. गावोगावी ग्रामसभा घेऊन महामार्गाच्या विरोधात ठराव करावेत. हा महामार्ग शक्तीपीठांना जोडणारा नाही तर सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत आर्थिक बळ देणारा आहे. या महामार्गामुळे भविष्यात अनेक संकटे उदभवणार आहेत. तेव्हा कोणतेही राजकारण न करता साऱ्यांनी मोठया ताकतीने ही लढाई करायची आहे.’
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘केवळ कोल्हापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर तेरा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग हद्दपार करायचा आहे. या महामार्गामुळे २१ हजार जमीन बाधित होणारी आहे. त्यापैकी सोळा हजार एकर जमीन बागायत आहे. या महामार्गामुळे कोल्हापूर, सांगलीचा महापुराचा धोका वाढणार आहे. साखर कारखानदारी परिणाम होणार आहे. ८६ हजार कोटीचा हा प्रकल्प आता एक लाख १५ हजार कोटीवर पोहोचला आहे. यातील ५५ हजार कोटी रुपयांचा ढपला पाडला जाणार आहे. शक्तपीठ समर्थनार्थ लाभापोटी काही उंदरे आता बिळातून बाहेर पडत आहेत. मात्र शेतकऱ्यांचे जीवनमान उद्धवस्त करणारा हा महामार्ग असून तो कदापि होऊ देणार नाही.’
.......................................................
कोल्हापुरी हिसका दाखवू…चांगला पाहुणचार करू
माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी, ‘आंदोलन व चळवळ हेच राज्यकर्त्यांना धडा शिकवणारी साधने आहेत. शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाला आता चळवळीचे स्वरुप लाभले आहे.’असे नमूद केले. माजी आमदार के. पी. पाटील यांनी, ‘शक्तीपीठ विरोधातील लढाई दीर्घकाळ लढावी लागेल. हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत संघर्षाची तयारी ठेवा.’असे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहूल देसाई म्हणाले,‘शेतकऱ्यांच्या हक्काच्या शेतजमिनी वाचविण्यासाठी ही लढाई आहे. हा जिल्हा निसर्गसंपन्न आहे.कोल्हापूर केवळ तांबडा-पांढरा रस्स्यासाठी प्रसिद्ध नाही तर चुकीच्या गोष्टी घडल्या तर कोल्हापुरी हिसका दाखवू.’ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे म्हणाले,‘शक्तीपीठ महामार्गमुळे बोरवडे परिसरातील शेकडो एकर शेती बाधित होणार आहे. सोबत घरे उद्धवस्त होण्याची भिती आहे. जीवात जीव असे पर्यंत शक्तीपीठच्या विरोधात लढू. शिवाय महामार्गाकरिता जमिनीच्या सर्व्हेसाठी जे कोणी येतील त्यांचा चांगलाच पाहुणचार करू’असा इशारा दिला. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधातील लढयात दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा संपूर्ण गट जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहभागी असल्याचे सांगितले. मेळाव्याला जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, सुधीर देसाई, राजेंद्र सुर्यवंशी, सागर धुंदरे, चंदगडचे गोपाळराव पाटील, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील, बाबासो चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, चेतन नरके, माजी संचालक पी. डी. धुंदरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हिंदुराव चौगले, शशिकांत खोत, जीवन पाटील, पांडुरंग भांदिगरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सचिन विश्वास पाटील, किशोर पाटील, केरबा पाटील, बाजार समिती संचालक भारत पाटील भुयेकर, पैलवान संभाजी पाटील, बाळासाहेब सरनाईक,शामराव देसाई, बिद्रीचे संचालक सत्यजित जाधव , रणधीर मोरे, धीरज डोंगळे, सुशील पाटील, डॉ. के. एन. पाटील, सागर कोंडेकर, अभिषेक मिठारी, अजित जाधव आदी उपस्थित होते.
.............................
पालकमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी… शिवाजी पाटलांनी दिशाभूल करू नये
शक्तीपीठ महामर्ग विरोधी समितीचे निमंत्रिक गिरीष फोंडे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, राधानगरी पंचायत समितीचे सभापती आर. वाय. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, कॉम्रेड उदय नारकर, अतुल दिघे, शिवाजीराव मगदूम, संपत देसाई, सम्राट मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित पोवार, बाजीराव देवाळकर, आर. एस. पाटील, पोहोळे येथील रोहित पाटील, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील, सदाशिव चरापले यांनी भाषणात शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघातून हा महामार्ग जाणार आहे. त्यांनी तत्काळ भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी महामार्ग समर्थनावरुन शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये असे आवाहनही मेळाव्यातून करण्यात आले.