लिंगायत समाजाचा कोल्हापुरात एल्गार ! आमदार शिवाजी पाटलांची मध्यस्थी, मुख्यमंत्र्यांच्यासोबत मंगळवारी मंत्रालयात बैठक ! !
schedule09 Aug 26 person by visibility 68 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मी लिंगायत - माझा धर्म लिंगायत, भारत देशा -जय बसवेशा, आमचा हक्क - आमचा अधिकार, आम्ही लिंगायत - मी लिंगायत…’अशा घोषणा देत लिंगायत समाज रविवारी रस्त्यावर उतरला. ‘महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास स्वायत्त दर्जा व भरीव निधी द्यावा, लिंगायत समाजास महाराष्ट्रात धार्मिक अल्पसंख्याक जाहीर करावा’अशी मागणी करत हजारो लिंगायत बांधवांनी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून लिंगायत समाजाने संघटित शक्ती दाखविली. आमदार शिवाजी पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. लिंगायत समाजाच्या मागणीसंबंधी सरकार सकारात्मक आहे, याविषयासंबंधी मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी मंत्रालयात बैठक घेऊ.’अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. लिंगायत समाजाच्या दहा जणांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. यामुळे लिंगायत समाजातर्फे ९ ऑगस्टपासून आयोजित साखळी उपोषण स्थगित केले. दरम्यान आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती.
लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक व्हावी, समाजाच्या प्रश्नांच्याकडे सरकारचे लक्ष वेधावे यासाठी समस्त लिंगायत समाजातर्फे ९ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला. तसेच धरणे आंदोलनही पुकारले होते. गेले महिनाभर जिल्ह्यातील लिंगायत समाजात आंदोलन व मागण्यासंबंधी जागृती सुरू होती. रविवारी, लिंगायत समाज मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाला. कुडलसंगम येथील मृत्यूंजय स्वामी, अल्लमप्रभू येथील बसवप्रभू यांची आंदोलनस्थळी प्रमुख उपस्थिती होती.
‘आम्ही लिंगायत – मी लिंगायत, मी लिंगायत – माझा धर्म लिंगायत, भारत देशा – जय बसवेशा, एक लिंगायत – कोटी लिंगायत …’अशा मजकुराचे फलक व टोप्या परिधान करुन लिंगायत समाज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. मोठया संख्येने समाजबांधव एकवटल्याने बसंत -बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारसमोर सभा घेण्यात आली. ‘महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास स्वायत्त दर्जा देऊन एक हजार कोटी निधी द्यावा आणि विनातारण कर्ज योजना लागू करावी, समाजातील सगळया घटकांना महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळायला हवा.’यासाठी आंदोलन पुकारल्याचे लिंगायत धर्म महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एस. पाटील, नगरसेवक संजय तेलनाडे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, नितीन पाटील यांनी सांगितले. दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी लिंगायत समाजाच्या मागण्या रास्त आहेत, हा समाज लोकशाही मार्गाने आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधत आहे. सरकारने समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करावी अशी मागणी केली.दरम्यान आंदोलनस्थळी विविध संघटना प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींनी भेट देऊन पाठिंबा दिला.
आमदार शिवाजी पाटील यांनी लिंगायत समाजाच्या मागण्यांच्या सोडवणुकीसाठी आपण मुख्यमंत्र्यासोबत बैठक घडवून आणू अशी ग्वाही दिली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी, लिंगायत समाजासोबत आपण कायम आहोत. लिंगायत समाज हा शांतताप्रिय समाज आहे. सरकारने या समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नये. उपद्रवमूल्य कमी आहे म्हणून जर त्रास देण्याचा प्रकार घडला तर तो सहन करणार नाही.’असे ठणकावले. माजी आमदार उल्हास पाटील, अशोक स्वामी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, शैलजा पाटील, माजी सदस्य अर्चना चौगुले, पंचगगा कारखान्याचे माजी संचालक बाबगोंडा पाटील, सरला पाटील, वैशाली पाटील, जयश्री आप्पा पाटील यांची भाषणे झाली. लिंगायत समाजात धार्मिक अल्पसंख्याक दर्जा जाहीर करावा अशी मागणी अनेकांनी सरकारकडे केली. सांगलीसह आसपासच्या जिल्ह्यातील लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा जाहीर केला. या आंदोलनात सुभाष महाजन, राजेंद्र पिंपळे, आण्णासाहेब कागले, शंकर बिराजदार, दत्ता भेंडवडे, मनोजकुमार रणदिवे, चारुशीला तासगावे, सुधीर शहापुरे, रमेश मिठारे, संतोष पाटील, स्वप्नील चौगले, संजय पाटील, अभिनंदन नायकवडे, नितीन बागे, राजशेखर तंबाखे, दत्तात्रय खडके यांच्यासह हजारो लिंगायत बांधव सहभागी झाले.
……………
’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लिंगायत समाजाच्या मागण्यासंबंधी चर्चा केली. त्यांना आंदोलनाची माहिती दिल. हजारो लिंगायत बांधव रस्त्यावर आंदोलन करत आहेत. ही माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या मंगळवारी लिंगायत समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैठक घेऊ असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. समाजाला नक्कीच न्याय मिळेल. प्रश्न निकाली लागेल.’
- आमदार शिवाजी पाटील