सर्वपक्षीय शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा ! महापौर म्हणाल्या, साऱ्यांनी मिळून डी.वाय. पाटील यांचे स्मारक साकारू ! !
schedule08 Aug 26 person by visibility 9 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रात माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांनी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा सदैव समाजाला लाभावी, यासाठी सारे मिळून कोल्हापुरात ‘डॉ. डी. वाय. पाटील यांचे स्मारक साकारू या.’असे मत महापौर रुपाराणी निकम यांनी व्यक्त केले.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी शनिवारी आठ ऑगस्ट २०२६ कोल्हापुरात सर्वपक्षीय शोकसभा झाली. स्टेशनर रोडवरील काँग्रेस कमिटी येथे शोकसभा झाली.खासदार शाहू महाराज हे शोकसभेच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी अनेकांनी, ‘डॉ. पाटील यांच्या कार्याना उजाळा देताना व्यक्तिगत आठवणी जागविल्या. तीन राज्याचे राज्यपाल, राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार, नावलौकिक असूनही डॉ. पाटील यांनी माती आणि माणसांशी कधी नाळ तोडली नाही. कोल्हापूरचे नाव त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पोहोचविले.’अशा शब्दांत गौरवोल्लेख केला. अध्यक्षस्थानावरुन बोलताना शाहू महाराज म्हणाले, ‘डॉ. डी.वाय. पाटील व माझी ओळख १९७० पासूनची होती. ते, शहाजी महाराज यांचे मित्र होते. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील काम खूप मोठे आहे. त्यांनी बहुजन समाजातील मुलांना उच्च शिक्षणाची संधी दिली.’अशा शब्दांत कार्याचा मोठेपणा सांगितला.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी, डॉ. डी.वाय. पाटील यांच्या कामांना उजाळा दिला. रांगडा पाटील आमदार कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण होय. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांनी समाजघटकाला मोठे करण्याचे काम केले असे सांगितले. माजी मंत्री भरमू आण्णा पाटील यांनी डॉ. डी.वाय. पाटील यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविणे हीच त्यांना आदरांजली ठरेल असे सांगितले. माजी आमदार संजय घाटगे यांनी, ‘डी. वाय. पाटील यांची शिक्षणक्षेत्रातील भरारी मराठी माणसाला अभिमानास्पद आहे.’असे नमूद केले. माजी आमदार राजू जयवंतराव आवळे यांनी, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी युवा पिढी घडविली असे म्हटले. माजी आमदार राजीव आवळे यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या. माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी त्यांचे सर्व क्षेत्रातील कार्य नेटाने पुढे चालविणे हीच त्यांना आदरांजली असल्याचे म्हटले. माजी आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, ‘डॉ. डी.वाय. पाटील यांनी ज्या संस्था उभ्या केल्या त्याद्वारे त्यांच्या ज्ञानाची ज्योत सदैव तेवत राहील.’
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्यासोबतच्या डॉ. पाटील यांच्या आठवणी जागविल्या. कौस्तुभ गावडे म्हणाले, ‘डॉ. डी. वाय. पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. त्यांचे विचारकार्य नेहमी प्रेरणा देणारे आहे. त्यांनी, ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’या विचाराने काम करत राहा अशा शब्दांत आपणाला आशीर्वाद दिले होते.’ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने यांनी, डॉ. डी. वाय. पाटील हे राज्यपाल झाले, तेव्हा आपली भेट झाली होती. मोठया पदावर जाऊनही त्यांनी त्यांच्यासोबत पूर्वी काम केलेल्या माणसांना, मित्रांना कधी विस्मरण होऊ दिले नाही.अशी आठवण सांगितली.
कॉम्रेड सतीश कांबळे यांनी, ‘डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावांनी कोल्हापुरात ज्ञानपीठ शैक्षणिक परिसर निर्माण करुन विविध क्षेत्राला चालना द्यावी असे म्हटले. काँग्रेसच्या पदाधिकारी सरला पाटील यांनी, ‘समाजमनाच्या त्यांच्यासंबंधीच्या ज्या आठवणी आहेत त्याला ग्रंथरुप देऊन प्रकाशिक करावे.’असे सुचविले. शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्क विजय देवणे यांनी व्याख्यानमाला सुरु करावी. त्याद्वारे विचारमंथन घडेल’असे मत मांडले. हॉटेल मालक संघटनेचे आनंद माने, चंदगडमधील नेते गोपाळराव पाटील, राधानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चौगले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवान पाटील, जनता दलाचे वसंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित पवार, माजी नगरसेवक भारती पोवार, साथी हसन देसाई, कॉम्रेड दिलीप पवार, उदय नारकर, सुभाष देसाई, बाळासाहेब मर्दाने, लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे सुभाष जाधव, सीमा पाटील, रणजितसिंह जाधव, माजी नगरसेवक अशोक भंडारे, भूपाल शेटे, दादासाहेब लाड, प्रा. अण्णासाहेब क्वाणे, आपचे उत्तम पाटील यांनी डॉ. डी.वाय. पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडले. माजी महापौर आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, महापालिकेतील विरोधी पक्षेनेत राजेश लाटकर, भरत रसाळे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडे, नगरसेवक राहुल माने, सुषमा संतोष जरग, वैभवी जरग, नगरसेवक अमर समर्थ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, गोकुळचे संचालक माजी संचालक बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, नंदकुमार ढेंगे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
………………………
…………………………………………