शहीद शिक्षण परिवाराने दिले स्वप्नांना बळ, डोंगराळ भागातील मुलांनी केली यूपीएससी परीक्षा सर
schedule09 Aug 26 person by visibility 24 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : डोंगराळ भागातील आणि आर्थिकदृष्टया मागास कुटुंबांतील तो विद्यार्थी…मात्र शाळेत हुशार...प्रत्येक इयत्तेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत एकेक पायरी वर चढणारा….त्याच्या अभ्यासाची आवड…शिकण्याची जिद्द हेरली ती तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने. आणि दहावीपासून त्याचे शैक्षणिक पालकत्वच स्वीकारले. शिक्षणाचा संपूर्ण खर्च, योग्य मार्गदर्शन आणि करिअर घडविण्यासाठी आवश्यक पाठबळ दिले. तो मुलगाही मोठया जिद्दीचा. शहीद शिक्ष्ण प्रसारक मंडळाच्या पाठबळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) परीक्षेत सहायक सेनानी (असिस्टंट कमांडंट) या पदावर निवड झाली…कुणालाही अभिमानास्पद वाटावी आणि प्रशासकीय सेवेत करिअर करू ईच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी अशी ही कहाणी आहे, राधानगरी तालुक्यातील कासारवाडापैकी धनगरवाडा येथील पांडूरंग बाबूराव फोंडे यांची. पांडूरंग यूपीएससी परीक्षेत पास झाला…प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचे त्याचे ध्येय साकारले…त्याचवेळी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचीही एका विद्यार्थ्याला यूपीएससी करण्याची स्वप्नपूर्ती झाली.
एका दुर्गम गावातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला शिक्षणाच्या माध्यमातून केंद्रीय पोलीस दलातील अधिकारी बनविण्यापर्यंतचा हा प्रवास ‘शहीद’च्या सामाजिक बांधिलकी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या संस्थेच्या ध्येयाची यशोगाथा ठरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचा दुर्गम भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देऊन त्यांना सक्षम भविष्याकडे घेऊन जाण्याचा उपक् यशस्वी ठरला आहे. संस्थेने दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्याची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) परीक्षेत सहायक सेनानी (असिस्टंट कमांडंट) या पदावरील निवड ही संस्थेसाठी अभिमानापस्द ठरली आहे. कारण डोंगराळ भागातील आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील पांडुरंगच्या शिक्षणाची व करिअर जडणघडणीची जबाबदारी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने दहावीपासून स्वीकारली होती.
या संपूर्ण प्रवासात आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील आणि मातोश्री वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी पांडुरंग यांच्या करिअर घडविण्यात विशेष योगदान दिले. एखाद्या विद्यार्थ्याला दत्तक घेणे म्हणजे केवळ त्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणे नव्हे; तर त्याच्या स्वप्नांना बळ देऊन त्याला सक्षम भविष्याकडे घेऊन जाणे होय,” या विचाराने कार्यरत असलेल्या शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला पांडुरंग यांच्या यशामुळे मोठी सार्थकता प्राप्त झाली आहे. पांडुरंग यांच्या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण ‘शहीद शिक्षण परिवारात’ आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे . पांडूरंग फोंडे यांच्या या यशाबद्दल शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच देशसेवेच्या नव्या प्रवासासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.