कुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र !
schedule19 May 26 person by visibility 86 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अंतिम मुलाखती होऊन पाच दिवसाचा कालावधी होत आला तरी सुद्धा नियुक्ती झाली नाही. हा विषय उच्च शिक्षण क्षेत्रात सध्या चर्चेचा बनला आहे. दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसाठी होत असलेल्या तिरंगा इकडे सिनेट सदस्यांनी लक्ष वेधले आहे. सिनेट सदस्य अभिषेक मिठारी, अजित जाधव, श्वेता परुळेकर, अमित जाधव यांनी राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा यांना मेल करून लक्ष वेधले आहे. तसेच यासंबंधीच्या मागणीचे पत्रही पाठवले.
"शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण आणि अग्रगण्य सार्वजनिक विद्यापीठ आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव धारण करणाऱ्या या विद्यापीठाला राज्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष स्थान आहे. ग्रामीण व बहुजन समाजातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये या विद्यापीठाचे मोठे योगदान राहिले आहे.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठातील कुलगुरू नियुक्ती प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चिंता व्यक्त होत आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची मुदत संपून तब्बल नऊ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असून अद्याप नियमित कुलगुरू नियुक्ती जाहीर झालेली नाही. विद्यापीठाच्या इतिहासामध्ये इतका प्रदीर्घ काळ कुलगुरू पद रिक्त राहिल्याची उदाहरणे अत्यंत दुर्मिळ असून हा अभूतपूर्व प्रकार आहे.
नियमित प्रक्रियेनुसार विद्यमान कुलगुरूंची मुदत समाप्त होण्यापूर्वीच नवीन कुलगुरू निवडीसाठीची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात जाहिरात प्रसिद्ध करण्यापासून पुढील सर्व टप्प्यांमध्ये सातत्याने विलंब झाल्याचे दिसून आले. डिसेंबर महिन्यात झालेल्या सिनेट सभेमध्ये सदस्यांनी या विषयाकडे तीव्र निदर्शने करून लक्ष वेधल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतरही मुलाखती प्रक्रिया, अंतिम पाच उमेदवारांची मुलाखत आणि अंतिम निर्णय या सर्व बाबींमध्ये अपेक्षित वेग दिसून आला नाही. 14 मे 2026 रोजी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. सामान्यतः या टप्प्यानंतर नियुक्ती प्रक्रियेला अंतिम स्वरूप मिळणे अपेक्षित असते. मात्र अद्याप कुलगुरू पदाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यापीठ ही केवळ प्रशासकीय संस्था नसून समाजाच्या बौद्धिक आणि वैचारिक प्रगतीचे केंद्र असते. त्यामुळे अशा महत्त्वाच्या पदावरील दीर्घकाळ अनिश्चितता राहिल्यास विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेवर, धोरणात्मक नियोजनावर तसेच शैक्षणिक वातावरणावर त्याचा परिणाम होत असतो. अनेक शैक्षणिक व सामाजिक घटकांकडून या विलंबाबाबत तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करण्यात येत असून प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. आम्ही अधिसभा सदस्य देखील या विलंबाची तीव्र नाराजी नोंदवित आहोत.
राज्याच्या उच्च शिक्षण व्यवस्थेची प्रतिष्ठा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम राखण्यासाठी कुलगुरू नियुक्ती प्रक्रिया अधिक गतिमान आणि वेळबद्ध पद्धतीने पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा राज्यपाल वर्मा यांनी या विषयात सकारात्मक लक्ष घालून शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची नियुक्ती लवकरात लवकर जाहीर करावी, "अशी मागणी केली आहे.