कोल्हापुरात प्रवेश करणारे रस्ते राज्यमार्ग घोषित करा,बांधकाम विभागाकडे घ्यावेत ! अमल महाडिकांची मागणी
schedule18 Nov 23 person by visibility 670 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.
मंत्री चव्हाण हे शनिवारी, १८ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर होते. याप्रसंगी महाडिक यांनी त्यांची भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर या रस्त्यांची अवस्था सुधारेल आणि कोल्हापूर महानगरपालिकेवरील बोजा कमी होऊन भाविक, पर्यटक आणि कोल्हापूरच्या नागरिकांची सोय होईल असा विश्वासही महाडिक यांनी व्यक्त केला आहे. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. वर्षानुवर्षे कोल्हापुरात प्रवेश करताना नागरिकांना खराब रस्ते आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय. कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे या रस्त्यांची देखभाल करणे महानगरपालिकेला शक्य होत नाही. परिणामी कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते खड्डेमय बनले आहेत. या रस्त्यांवरून वाहन चालवणे धोकादायक बनले आहे.
पर्यटक आणि भाविकांची कोल्हापुरात होणारी वाढती गर्दी लक्षात घेता कोल्हापुरात प्रवेश करणारे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत घ्यावेत अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी मंत्री चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यामध्ये शिये फाटा ते कसबा बावडा ते ताराराणी पुतळा रस्ता, तावडे हॉटेल ते ताराराणी पुतळा रस्ता, फुलेवाडी चौक ते महानगरपालिका, वाशी नाका ते महापालिका, शिवाजी पूल ते महापालिका,उजळाईवाडी ते ताराराणी पुतळा,सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठ आणि उचगाव ते टेंबलाई नाका चौक या रस्त्यांचा समावेश आहे.