महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : करवीर संस्थापिका रणरागिनी छत्रपती ताराराणी यांचा इतिहास प्रकट करणारे स्मारक आणि दालन कोल्हापुरात साकारावे अशी मागणी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानने केली.
महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान, रण मर्दानी महिला मंच, निर्भया महिला मंच व ताराराणी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत, येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत यासंदर्भात निर्णय झाला नाही तर आंदोलन करू असा इशाराही प्रशासनाला दिला. जिल्ह्यातील तिन्ही खासदार व आमदार यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. लोकप्रतिनिधींनी सरकारी पातळीवर करवीर संस्थापिका ताराराणी यांचे स्मारक कोल्हापुरात होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे.
छत्रपती ताराराणी यांच्या काळात पन्हाळ्याला राजधानीचे स्वरूप होते. करवीर संस्थानचा उदय झाला. छत्रपती ताराराणी यांनी वयाच्या २५ व्या वर्षी हाती तलवार घेऊन बलाढ्य औरंगजेबाला झुंज दिली. करवीर संस्थापिका ताराराणी यांचा इतिहास पुढे आला पाहिजे या दृष्टीने स्मारक आणि दालनची उभारणी करावे. पत्रकार परिषदेला समीर काळे, स्वाती काळे, डॉ. रेखा जांभळे, अश्विनी हुल्ले, शाहीन धारवाडकर, वर्षा पाटील, अश्विनी जाधव, ज्योती सावंत, अश्विनी माने, दिशा पाटील, उलफत मुल्ला उपस्थित होते.