शाळेबद्दल शिक्षिकेचे मनोगत…‘डोळ्यांमध्ये हे स्वप्न साठवावे ! कितीदा तरी नव्याने आठवावे !!’
schedule13 Apr 22 person by visibility 3038 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर ही महापालिकेच्या माललकीची शहरातील एक नावाजलेली शाळा. शाळेचा २८ वा वर्धापनदिन नुकताच झाला. शाळेच्या वर्धाप दिनानिमित्त शिक्षकांच्या निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत सहायक शिक्षिका मेघा संदीप सावंत यांनी लिहिलेल्या, ‘मी अनुभवलेली माझ्या शाळेची प्रवेश प्रक्रिया…’या निबंधाला प्रथम क्रमांक मिळाला. गुढीपाडव्याला या शाळेतील पहिलीचे प्रवेश हाउसफुल्ल झाले. शाळा, प्रवेश प्रक्रियेविषयी शिक्षिकेचे मनोगत त्यांच्याच शब्दांत…
‘चैत्रातील सर्व बहर जणू काही आज शाळेच्या अंगणातच अवतरला होता. गुणवत्तेचे तोरण शाळेच्या चौकटीवर शोभून दिसत होते. शिक्षकांच्या कृतिशीलतेची रांगोळी दारी सजली होती. शाळेच्या नावलौकिकाचा शालू सर्वत्र पांघरला होता. पालकांच्या कडून कौतुकाचा गोड-धोड नैवेद्याचा थाटमाट मांडला होता. आणि मुख्याध्यापकांच्या कडूलिंबरुपी गुणकारी व सक्षम नेतृत्वामुळे शाळेच्या पटसंख्येची गुढी उंचच उंच चढत होती.
मंडळी हे वर्णन कोणत्या एका धार्मिक सणाचे नाही तर एका दैदिप्यमान व मराठी शाळेसाठी अभिमान वाटाव्या अशा सोहळ्याचे आहे. हा सोहळा पार पडत होता माझ्या माझ्या शाळेत आणि मी आज स्वतः या अभूतपूर्व सोहळ्याची साक्षीदार बनले होते.
आठवडाभर आधीपासूनच मनात विचारांचे काहूर माजले होते. उत्सुकतेची घाई घेऊन आठवडा कधी सरला हे कळलेच नाही आणि गुढीपाडव्यादिवशीतो "सोनियाचा दिनू" उगवला. हा दिवस कोणत्या बक्षीस समारंभाचा नव्हता, हार-तुरे मिरवण्याचा नव्हता तर त्याहूनही आगळा-वेगळा असा माझ्या शाळेचा इयत्ता पहिलीचा प्रवेश उत्सव सोहळा होता.
राज्यभर गुणवत्तेचा डंका वाजवणारी माझी शाळा, दरवर्षी गुढीपाडव्यादिवशी "हाउसफुल" या शब्दाचा अर्थ सांगणारी माझी शाळा. स्कॉलरशिप परीक्षेत दरवर्षी नवनवीन विक्रम रचणारी माझी शाळा.
त्या दिवशी शाळेच्या आवारात येताच समोरचा पालक वर्ग पाहताच डोळे दिपून गेले. एका शिक्षकाला आपल्या शाळेमध्ये प्रवेशासाठी झालेली अशी गर्दी पाहायला मिळणे यापेक्षा मोठे समाधान काय ! अगदी नवख्या माणसाला न पटणारी गोष्ट म्हणजे ‘पहाटे तीन वाजल्यापासून’ पालक प्रवेशासाठी रांग लावून उभे होते.
गर्दीतून मी वाट काढत येत असताना गळ्यातील ओळख पत्रावरून पालकांनी वाट देऊन आदर व्यक्त केला. समोर येऊन जेव्हा मी या गर्दीवर एक नजर फिरवली तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता. शाळेचे मुख्याध्यापक उत्तम गुरव आणि त्यांचे सर्व शिलेदार देखील सज्ज होते अशा या आगळ्यावेगळ्या प्रवेश उत्सवासाठी.
पत्रकारितेला मानवंदना देऊन प्रवेश उत्सवाला सुरुवात झाली. ‘शिस्त, नियोजन व व्यवस्थापन’ या सर्वांचा मेळ आजच्या प्रक्रियेतून दिसू लागला. सकाळी ठीक आठ वाजता सुरू झालेली ही प्रवेश प्रक्रिया आणखीनच बहरत होती. दुपारचे बारा एक वाजले तरी वेळ इकडे कोणाचे लक्ष नव्हते. प्रवेश संख्या जसजशी वाढत होती तशी अभिमानाने आमची छाती सुद्धा इंच- इंच वाढत होती. प्रवेशाचे शतक... द्विशतक... त्रिशतक... होऊन इयत्ता पहिलीचे प्रवेश साडे चारशेच्या पलीकडे गेले.
‘डोळ्यांमध्ये हे स्वप्न साठवावे,
कितीदा तरी नव्याने आठवावे’
खरंच या प्रवेश प्रसंगाचे वर्णन करण्यासाठी या दोन ओळी पुरेशा आहेत. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया ही आयुष्यभर स्मरणात राहीलच. पण एक सरकारी शाळेतील शिक्षक म्हणून हिंदी सिनेमातील ओळी आठवतात,
‘ये तो अभी शुरुवात है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !’