हद्दवाढीला विरोधच, वीस गावात बंद ! इंचभरही जमीन महापालिकेला देणार नाही !!
schedule17 Jun 25 person by visibility 43 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर शहरालगतच्या वीस गावात मंगळवारी (१७ जून २०२५) कडकडीत बंद पाळला. गावातील सर्व व्यवहार बंद होते. प्रमुख चौकात एकत्र येत ग्रामपंचायत सदस्यांनी हद्दवाढीला विरोध कायम राहील असा इशारा दिला. सरकारने, ग्रामीण भागातील जनतेच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला तर आगामी स्वानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्का टाकू. हद्दवाढीच्या विरोधात लढत राहू, एक इंचभरही जमीन महापालिकेला देणार नाही असा निर्धार हद्दवाढ विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, उचगाव, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गांधीनगर, वळीवडे, पीरवाडी, आंबेवाडी, नागदेववाडी, शिये, नागाव, गोकुळ शिरगाव, पुलाची शिरोली, कळंबे तर्फे ठाणे, बालिंगा, वडणगे, शिंगणापूर या गावात बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच गावातील सर्व दुकाने बंद होती. हद्दवाढीला विरोध दर्शविणारे फलक प्रमुख चौकात उभारले होते. वीस गावातील बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला होता. पुलाची शिरोली येथे काही तरुणांनी हद्दवाढीच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. ‘शोले’ सिनेमा स्टाइल झालेल्या आंदोलनामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रशासनाची धावपळ झाली. पोलिसांनी, हस्तक्षेप केल्यानंतर तरुण पाण्याच्या टाकीवरुन उतरले. हा प्रकार वगळता वीस गावात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दिवसभर बंद पाळण्यात आला.