हद्दवाढ दृष्टीक्षेपात, तत्वत: मान्यता-आमदार राजेश क्षीरसागर
schedule17 Jun 25 person by visibility 353 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या दृष्टीने आजचा दिवस हा अंत्यत महत्वपूर्ण आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व दोन्ही सचिव यांनी साधारणता हद्दवाढीला तत्वत: मान्यता दिली आहे.’अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीत क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी हद्दवाढ अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. हद्दवाढ करताना ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेण्याच्या सूचनाही बैठकीत झाल्या.
बैठकीनंतर क्षीरसागर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘आजच कोल्हापूर महापलिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना हद्दवाढीचा प्रस्ताव सरकारला सादर करण्याविषयकी पत्र देत आहे. तो प्रस्ताव त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवतील. मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित गावांना त्यांचे ठराव मागतील. संबंधित ग्रामपंचायती हद्दवाढीसंबंधीचा ठराव अनुकूल किंवा प्रतिकूल देतील. त्यानंतर प्रस्ताव सरकारकडे सादर होईल. त्यावर सरकार निर्णय घेईल. त्यानंतर गेली अनेक वर्षे रखडलेल्या हद्दवाढीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. हद्दवाढ दृष्टीपथात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेऊन लवकरच हद्दवाढ होईल.कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसून जिल्ह्यात एकत्र राहणारी मंडळी जिल्हयाच्या विकासाची गरज ओळखून हद्दवाढीसाठी सकारात्मक राहिले पाहिजेत.’