जिप सोसायटीतर्फे कर्जावरील व्याजदरात कपात ! सभासदांच्या पाल्यासाठी तीन लाखाचे शैक्षणिक कर्ज !!
schedule11 Jun 23 person by visibility 1311 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या सभासदांच्या पाल्यासाठी तीन लाख रुपये शैक्षणिक कर्ज देण्याची घोषणा चेअरमन रणजीत पाटील यांनी केली. तसेच कर्जावरील व्याजदरात पाव टक्के कपात केली आहे. कर्जावरील व्याजदर आता ९.२५ टक्के झाला. शिवाय सोसायटीला मार्च २०२३ अखेर तीन कोटी ४५ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. २०२२-२०२३ या वर्षासाठी सभासदांना १२.५० टक्के लाभांश वाटप देण्यात येणार असल्याचे घोषित केले. एकूण सभासदांना मिळून एक कोटी ३७ लाख रुपये इतकी लाभांशची रक्कम दिली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (११ जून) झाली. साईक्स एक्सटेन्शन येथील जिल्हा परिषद सोसायटीच्या सभागृहात वार्षिक सभा झाली. सभेपुढील सर्व विषय मंजूर करण्यात आले. चर्चेअंती सभासद वर्गणी एक हजार रुपये करण्यात आली.
सोसायटीचे चेअरमन रणजीत पाटील यांनी आर्थिक वर्षातील संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. चेअरमन पाटील म्हणाले, "एक जून २०२३ पासून कर्जावरील व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी करून तो ९.२५ टक्के करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच ९.२५ टक्के पर्यंत व्याजदर खाली आला आहे. भविष्यात कर्जाचा व्याजदर आणखी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सभासद नियमित कर्ज मर्यादा पगाराच्या पटीत ३५ लाख रुपये आहे. सभासद आकस्मिक कर्ज मर्यादा एक लाख व सभासदांच्या पाल्यासाठी शैक्षणिक कर्ज तीन लाख देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.२०२२-२३ या वर्षासाठी सभासदांना कायम ठेवीवर ९.५० टक्के व वर्गणी ठेवीवर ८.५० टक्के व्याज व्याजदराचा निर्णय घेतल्याचे सांगितले. २०२२-२३ या वर्षांमध्ये सोसायटीची आर्थिक उलाढाल ८५५ कोटी ३१ लाख इतकी झाली. ३१ मार्च २०२३ अखेर १६८ कोटी १३ लाखाच्या ठेवी झाले आहेत. तर १८४ कोटी ९९ लाख रुपये कर्ज वाटप झाले आहे.
सभेत पदोन्नती मिळालेल्या सभासद व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेवानिवृत्त सभासद दिलीप बच्चे, सुजाता सोलणकर, रवींद्र घस्ते यांनी मनोगत व्यक्त केले. सभेत सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन व संचालक मंडळाने उत्तरे दिली. संचालक शिक्षक सुनील पाटील यांनी स्वागत केले. संचालक अजय शिंदे यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले. व्यवस्थापक व्ही एन बोरगे यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. व्हाईस चेअरमन मुजमिल अहमद नावळेकर यांनी आभार मानले. व्यासपीठावर सोसायटीचे माजी चेअरमन राजीव परीट, संचालक महावीर सोळांकुरे, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, रवींद्र जरळी, श्रीकांत चव्हाण, बाजीराव पाटील, सचिन गुरव, सरदार दिंडे, नंदीप मोरे, साताप्पा मगदूम, जयकुमार रेळेकर, सुधाकर कांबळे, उत्तम वावरे, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव, प्रकाश सोहनी, पांडुरंग पवार होते.
एम आर पाटलांनी केले चेअरमनांचे कौतुक...
सोसायटीचे मार्गदर्शक एम. आर.पाटील यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. सोसायटीच्या निवडणुकीत सभासदांनी सत्ताधारी आघाडीला कौल दिला याबद्दल आभार मानले.जिल्हा परिषद सोसायटी सगळया सभासदांची आहे. संस्थेच्या हिताचा विचार करून निर्णय व्हायला हवा. सभासदांनी भावनिक होऊ नये. निवडणुकीच्या काळात विरोधकांनी चुकीचा प्रचार केला मात्र सभासदांनी त्याला चोख उत्तर दिले. निवडणुकीच्या कालावधीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला चेअरमन करणार याची ग्वाही सत्ताधारी आघाडीने दिली होती. संचालक रणजीत पाटील यांना चेअरमन करून तो शब्द पाळला. चेअरमन रणजीत पाटील व संचालकांनी सोसायटीचे कामकाज उत्कृष्ट केले आहे. वार्षिक सभेत चेअरमन पाटील यांनी चांगल्या पद्धतीने विषयांची मांडणी करत सभासद हिताला प्राधान्य दिले. सोसायटीची वार्षिक सभा ही कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन झाले पाहिजे. सभासदांनी केवळ वार्षिक सभेपुरते नव्हे तर वर्षभर संस्थेच्या हिताच्या, सोसायटीच्या उत्कर्षाच्या सूचना संचालकांच्याकडे मांडाव्यात. योग्य सूचना नक्कीच स्वीकारण्यात येतील."असे एम. आर.पाटील म्हणाले.
सभेला सुकाणू समितीचे नेते विश्वास साबळे, शिक्षक नेते राजाराम वरूटे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे एम.एम. पाटील, एम एम भाट, ग्रामसेवक संघटनेचे के. आर. किरुळकर, साताप्पा मोहिते, शिक्षक बँकेचे चेअरमन सुनील एडके, संचालक बाळासाहेब निंबाळकर, रामदास झेंडे, एस. व्ही. पाटील, राजेंद्र पाटील, पद्मजा मेढे, वर्षाा केनवडे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, जिल्हा परिषदमधील अजित मगदूम, फिरोजखान फरास, कपिल पाटील, दयानंद पाटील, किरण मगदूम, प्रवीण पाटील, एन एस इंगळेे, अभिजीत पाटील, एस बी गायकवाड, दगडू परीट, संजय दाभाडेे, साताप्पापा चौगुले, सागर सरावणे, अशोक नायकवडी, संदीप काटकर, अश्विनी धारवाडकर, संगीता गुरव, मनीषा पालेकर सुनंदा कोष्टी, प्रतिमा शिर्के , ग्रामसेवक विभागाचे आर बी पाटील आदी उपस्थित होते.