महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनास लोकवर्गणीद्वारे निधी संकलन केले जात आहे. या निधीतून महात्मा बसवण्णा आणि त्यांच्या सहकारी शरण-शरणींच्या साहित्याचे अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रकाशन केले जाणार आहे. सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी १० मार्च २०२३ च्या अधिसभेमध्ये शरण साहित्य अध्यासन निर्मितीचा ठराव मांडला होता. ज्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान अध्यसनाच्या निधीसाठी अभिषेक मिठारी यांनी वर्षभरातील विविध कार्यक्रम, व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी ठिकाणी मिळालेले मानधन स्वरूपातील रक्कम अकरा हजार रुपये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांच्याकडे सुपूर्द केले. माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ९० व्या वाढदिनाच्या औचित्याने मिठारी यांनी ही रक्कम कुलगुरू शिर्के यांच्याकडे सुपूर्द केले.यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर आणि यश आंबोळे उपस्थित होते.