वादात सापडलेल्या पुरस्कारांची दोन वर्षांनी घोषणा : जिल्हास्तरीय यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार माणगाव व हत्तिवडे ग्रामपंचायतीला विभागून
schedule03 Aug 20 person by visibility 271 categoryजिल्हा परिषद
द्वितीय क्रमांकांचा पुरस्कार शाहूवाडी तालुक्यातील शिवारे ग्रामपंचायतीला
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : अधिकाऱ्यांकडून चुकलेली गुणांची बेरीज आणि समान गुण यामुळे दोन वर्षापूर्वी जिल्हास्तरीय यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार वाटपावरुन गुंता निर्माण झाला होता. पुरस्कार जाहीर करण्यावरुन पेच निर्माण होवून परिणामी २०१८-१९ या आर्थिक वर्षातील या पुरस्काराची घोषणा लांबली होती. तत्कालिन पदाधिकाऱ्यांमध्ये यावरुन वाद झाला होता. या दोन्ही गावांची पुर्नतपासणी केली असता त्यामध्येही समान गुण झाले आणि हातकणंगले तालुक्यातील माणगाव व आजरा तालुक्यातील हत्तिवडे ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय यशवंत ग्रामपंचायत हा प्रथम क्रमाकांचा पुरस्कार विभागून जाहीर केला आहे. जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकांचा पुरस्कार शाहूवाडी तालुक्यातील शिवारे ग्रामपंचायतीला मिळाला.
जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या सहीनिशी या पुरस्कारांची घोषणा झाली. प्रथम क्रमांकांच्या ग्रामपंचायतीस ५० हजार रुपये व द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस ३० हजार रुपये रोख स्वरुपात व पदक देऊन गौरविले जाते. जिल्हा परिषदेने स्वनिधीतून २००४-०५ या आर्थिक वर्षापासून यशवंत पुरस्कार योजना सुरू केली. उत्कृष्ट ग्रामपंचायत व सरपंच यांना सन्मानित करण्यात येते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागविले जातात. तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीस २५००० रुपये व द्वितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीला १५००० रुपयांच्या बक्षीसांनी गौरविले जाते. सरपंचांना वैयक्तिक स्वरुपात दहा हजार रुपये व पदक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तालुक्यातून आलेल्या प्रस्तावापैकी अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन ग्रामपंचायत जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवडल्या जातात.
यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार योजना २०१८-१९ साठीच्याउतकयृष्ट ग्रामपंचायत व सरपंच पुरस्कारासाठी जिल्ह्यातील बारा पंचायत समिती अंतर्गत प्रत्येक पंचायत समितीकडून दोन प्रस्ताव घेण्यात येतात.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निर्णय होतो.१८ डिसेंबर २०१८ रोजी निवड समितीची बैठक झाली होती. या निवड प्रक्रियेत हत्तिवडे व माणगाव या दोन्ही ग्रामपंचायतींना समान गुण मिळाले होते. अधिकाऱ्यांकडून गुणांची बेरीज चुकल्याचे समोर आले होते. दरम्यान समान गुणावरुन पुरस्कार वाटपाचा पेच निर्माण झाला होता. या प्रक्रियेदरम्यान तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक व तत्कालिन महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांचे दीर राजू मगदूम यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता.
वाद उद्भवल्यानंतर दोन्ही ग्रामपंचायतींची पुर्नतपासणीसाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि ग्रामपंचायतविभागाच्याउपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता.या समितीने दोन्ही ग्रामपंचायतींनी तपासणी करावी अणि जिल्हास्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांकाची घोषणा करावी अशी सूचना अध्यक्षांनी केली होती. प्रशासनाने ३१ जुलैपूर्वी निकाल जाहीर केला.