शिक्षकांचा एकच निर्धार, कौस्तुभ गावडेंना आमदार करुन विधानपरिषदेत पाठविणार
schedule26 Aug 26 person by visibility 106 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने तीन वेळा पुणे विभागाचा शिक्षक आमदार निवडून दिला आहे. आणि या प्रत्येक वेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील शिक्षकांची नेहमीच मोलाची साथ लाभली आहे. त्या बळावर आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत निश्चितपणे ऐतिहासिक विजय संपादन करण्याचा निर्धार करुन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गवडे यांना शिक्षक मतदारसंघातून व विधान परिषदेत पाठविण्याचा निर्धार करू या ’ असे आवाहन शिक्षक निर्धार मेळाव्यात करण्यात आला.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर विभागाच्यावतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे 'कोल्हापूर जिल्हा शिक्षकांचा निर्धार मेळावा' आयोजित केला होता.या मेळाव्यात, कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची पताका फडकवण्यासाठी सर्व शिक्षकांनी संघटित होऊन काम करण्याचा ठाम निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या कोल्हापूर विभागाचे प्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे, संस्थेचे आजीव सेवक व कोल्हापूर जिल्हा प्रचार प्रमुख भूपाल कुंभार, श्रीमती ए.आर. पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजीच्या प्राचार्या डॉ. श्रुती जोशी, सातारा जिल्हा विभागप्रमुख शशिकांत काटे, आजीव सेवक अजितकुमार देसाई, प्राचार्य पी.एस.चव्हाण, आर.डी.पाटील, विरेन भिर्डी, हुसैन पठाण यांनी भाषणात कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सर्व शिक्षकांनी जीवाचे रान करुन विक्रमी शिक्षक मतदार नोंदणी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन केले.
कौस्तुभ गावडे म्हणाले,‘ २००५ अगोदरच्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व्यापक काम सुरु असून शिक्षकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सन्मानाने जीवन जगण्यासाठी जुनी पेन्शन योजना़ मिळवणे हे प्रमुख ध्येय आहे. उद्योगाभिमुख प्रशिक्षण वाढावे आणि विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्ये मिळावीत यासाठी प्रयत्न करणे, सर्व कार्यरत शिक्षकांच्या आरोग्य विम्याची सुविधा कॅशलेस व्हावी, यासाठी पाठपुरावा करणे असे शिक्षकांचे सर्व प्रलंबीत प्रश्न् पुढील सहा वर्षात सोडविण्यासाठी सर्व शिक्षक माझ्या पाठीशी ठाम उभे राहावे.’