सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपुरात लोकनृत्य महोत्सव
schedule26 Aug 26 person by visibility 16 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, लोककला आणि लोकसंस्कृतीचा सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘लोकनृत्य महोत्सव’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव शनिवार, २९ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत डॉ. एस. एस. भिर्डी रंगमंदिर, जयसिंगपूर येथे दररोज सायंकाळी ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत आयोजित केला आहे.
या तीन दिवसांत तारपा, बोहाडा, सोंगी मुखवटे, मोरघा, लावणी, पालखी, बाल्या, दिवली, दिंडी, कोळी, शेतकरी, वाघ्या-मुरली, जागरण-गोंधळ, जोगवा, लेझीम, धनगरी (कैपत), पोतराज, मंगळागौर, बंजारा, गौर नाच, गज धनगरी आणि भिल्ल आदिवासी या विविध लोककला व लोकनृत्य प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार असून, या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, सांस्कृतिक वैविध्य आणि लोकजीवनाचे दर्शन रसिकांना घडणार आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यातील लोककला व लोकपरंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
‘लोकनृत्य महोत्सवा’चा प्रवेश विनामूल्य आहे. रसिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा अनुभवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत संगीता कैलास खेडेकर यांनी केले आहे.