यंदा शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर
schedule03 Sep 26 person by visibility 15 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यामातुन कोल्हापूरच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने कोल्हापुरातील विकासकामांसाठी गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. यामाध्यमातून आमदार क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नांनी शहरात विकासकामांचे अनेक नवे थर रचले जात आहेत आणि या माध्यमातून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा आलेख उंचावला आहे. यामध्ये प्रामुख्याने पूर नियंत्रण प्रकल्प, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, रस्ते, रंकाळा सुशोभिकरण, गांधी मैदानाचे काम, केशवराव भोसले नाट्यगृह नुतनीकरण या प्रमुख विकासकामांसह सर्किट बेंच, आय.टी.पार्क, महापालिकेतील रोजंदारी कर्मचारी कायम करणे अशा कामांमुळे कोल्हापूर नव्या रुपात परिवर्तीत होताना दिसत आहे. आगामी काळातही असेच कोल्हापूरच्या विकासाचे थर रचण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, यंदा शिवसेनेच्या वतीने “विकासाच्या भगव्या दहीहंडी” चे ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून छत्रपती शिवाजी चौक, कोल्हापूर येथे थरार रंगणार असल्याची माहिती युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव व नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यावर्षी दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपये इतके बक्षीस देण्यात येणार आहे. इतर आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. तरी या दहीहंडी स्पर्धेत जास्तीत जास्त गोंविंदा पथकांनी सहभाग घ्यावा आणि कोल्हापूर वासियांनी या दहीहंडीचा थरार पाहण्यास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहनही नगरसेवक क्षीरसागर यांनी केले आहे.