Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्ञानपीठ विजेते लेखक वि.स. खांडेकर हे मानवी जीवनाचे भाष्यकार, त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढे - डाॅ. भालचंद्र मुणगेकरखाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाइस चेअरमनपदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर कोल्हापुरात मंत्र्यांच्या समर्थकांची अधिकाऱ्यांवर दमबाजी ! कार्यालय पेटवण्याची, बुटाने मारण्याची धमकी ! !डी वाय पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारकार्यालयात नगरसेवकांची भांडणे, चौकात कार्यकर्ते आमनेसामने! महापालिकेचा बनतोय आखाडा, पदाधिकारी म्हणतात हा कौटुंबिक वाद !!आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले !  चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मला मिळेल, रविवारी प्रचाराचा शुभारंभ करणार - मंगेश चिवटेशिक्षक आमदार - जयंत आसगावकरांच्यासमोर आव्हान, महायुतीत रस्सीखेच! माजी आमदारही शर्यतीत !पोलिस प्रमुखांचे गणेश मंडळांना आवाहन ! उत्सवात लेझरचा वापर नको - आवाजाची मर्यादा पाळा!!७८९ दूध संस्था अपात्र, कागल – करवीर -राधानगरीतील संस्थांचा समावेश! दूध संस्था प्रतिनिधीची अधिकाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषा !!

जाहिरात

 

ज्ञानपीठ विजेते लेखक वि.स. खांडेकर हे मानवी जीवनाचे भाष्यकार, त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढे - डाॅ. भालचंद्र मुणगेकर

schedule02 Sep 26 person by visibility 30 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी:  ज्ञानपीठ विजेते लेखक वि. स. खांडेकर केवळ अलंकारिक भाषेचे साहित्यिक नव्हते, तर मानवी जीवनाचे भाष्यकार होते. जीवनात निर्मळता, सुसंस्कृतपणा, ध्येयनिष्ठा आणि शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा, हे त्यांच्या साहित्यामागील मूलभूत स्वप्न होते. त्यामुळे त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढेही टिकून राहते.' असे प्रतिपादन जेष्ठ अर्थतज्ञ व विचारवंत डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी केले.  

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वि. स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्षाच्या सांगता समारंभात ‘वि. स. खांडेकर : सुवर्ण स्मरण’ या विषयावर विशेष स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या. आंतरभारती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. सुनीलकुमार लवाटे, खांडेकरांचे नातू डॉ. अतुल कापडी प्रमुख उपस्थित होते.

खांडेकरांच्या ‘ययाती’ची आजची प्रस्तुतता १९६०च्या दशकापेक्षाही अधिक असल्याचे सांगताना डॉ. मुणगेकर यांनी ‘क्रौंचवध’मधील दिनकर-सुलोचना यांच्या नात्यातून शारीरिक वासनेपलीकडील आंतरिक प्रेम, तर ‘ययाती’मधून पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्रीच्या शोषणाचे टोकदार चित्रण खांडेकरांनी केले असल्याचे नमूद केले. मानवी जीवनातील विविध टोकांमधील संघर्ष आणि त्याचा आलेख मांडणारा साहित्यिक म्हणून खांडेकरांचे महत्त्व अधोरेखित होते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. मुणगेकर यांनी खांडेकरांच्या विविध साहित्यकृतींच्या आधारे त्यांच्या लेखनातील मानवी जीवनाचा व्यापक पट उलगडला. ते म्हणाले, खांडेकरांच्या साहित्यातून उपभोगवाद, पुरुषप्रधान मानसिकता आणि मानवी वासनेचा संघर्ष, प्रेम, त्याग, नैतिकता आणि हिंसेविषयीची भूमिका आजच्या समाजातील अनेक प्रश्नांशी थेट संवाद साधते. 

शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी खांडेकरांचे साहित्य हे केवळ एका पिढीपुरते मर्यादित नसून आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या युगातही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, तंत्रज्ञानामुळे माणूस अधिक सामर्थ्यवान झाला असला, तरी तो अधिक ‘माणूस’ झाला आहे का, हा प्रश्न आज विचारण्याची गरज असून खांडेकरांच्या साहित्याचा केंद्रबिंदू असलेली माणुसकी, नैतिकता, संवेदना, सामाजिक बांधिलकी आणि जीवनदृष्टी आजच्या पिढीला दिशादर्शक ठरू शकते. विद्यार्थ्यांच्या हातात केवळ पदवी नव्हे, तर विचार; केवळ कौशल्य नव्हे, तर विवेक आणि रोजगारासाठीच नव्हे, तर जीवनासाठी शिक्षण देणे, हीच खऱ्या अर्थाने खांडेकरांना आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

 विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी वि. स. खांडेकर यांचे शिवाजी विद्यापीठाशी स्थापनेपासूनच अतूट नाते राहिले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठाच्या पहिल्या अधिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून खांडेकरांनी प्रारंभीच्या काळात विद्यापीठाला मार्गदर्शन केले, तर ज्ञानपीठ पुरस्कारानंतर त्यांना मानद डी.लिट. पदवी देणारे महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ ठरले. शिवाजी विद्यापीठाने साकारलेले खांडेकरांचे स्मृती संग्रहालय म्हणजे विद्यापीठाने खांडेकरांविषयी जपलेल्या आदरभावाचेच प्रतीक आहे.

 प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही साहित्यिकांच्या प्रत्यक्ष विचारांतून आणि अनुभवांतून मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, आज माहिती आणि भाषणे काही क्षणांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून उपलब्ध होत असली, तरी प्रत्यक्ष दिग्गज साहित्यिकांचे विचार ऐकताना मिळणारा भावनिक आणि मानवी स्पर्श कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय ठरू शकत नाही. खांडेकरांच्या साहित्यात केवळ एका पिढीला नव्हे, तर पुढील पिढ्यांनाही घडविण्याची क्षमता असल्याने अशा साहित्यिकांच्या विचारांशी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संवाद घडविणारे कार्यक्रम सातत्याने होत राहणे आवश्यक आहे.

 आंतरभारती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर आणि डॉ. अतुल कापडी यांनीही खांडेकरांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes