गोकुळबद्दल सध्या काही बोलणार नाही, पण आमदार शिवाजी पाटलांचे आभार - हसन मुश्रीफांचा खोचक टोला
schedule02 May 26 person by visibility 37 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गोकुळ दूध संघाबद्दल आज या घडीला काहीही बोलणार नाही. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालादिवशी गुलाल लावूनच सविस्तर प्रतिक्रिया देईन, ’असा सूचक इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांनी आमदार शिवाजी पाटील करीत असलेल्या टीका आणि आरोपांबाबत विचारले असता दिला.
गेल्या ३५-४० वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीवरून हसन मुश्रीफ काय आहे, हे सबंध जिल्ह्यासह राज्यालाही माहित आहे. त्यामुळे कोण काय म्हणतय याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मला रिकामं केल्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. कारण; निवडणुकीमध्ये एकाच पॅनेलमध्ये आम्ही राहिलो असतो तर फार मोठी अडचण होणार होती. ही संभाव्य अडचण त्यांनी स्वतःहूनच दूर केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दरम्यान; मुख्यमंत्र्यांना गोकुळमध्ये आम्ही महायुतीचीच सत्ता आणू, असे वचन दिलेले आहे.’ असे मुश्रीफ म्हणाले.
कागलमध्ये अनौपचारिकरित्या पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोरगरिबांची सेवा हाच ध्यास घेऊन मी गेली ४० वर्षे सामाजिक आणि राजकीय वाटचाल करीत आलो आहे. माझे संपूर्ण आयुष्यच उघड्या पुस्तकाप्रमाणे जनतेसमोर आहे. कोण कसा आहे, हे जनता चांगलंच ओळखते. लोक निश्चितच तुलना करून आपला निर्णय घेतील. त्यामुळे, मला अधिक बोलण्याची गरज नाही आणि मी बोलणारही नाही. तसेच; याच जनतेने मला सलग सहावेळा आमदारपदी निवडून दिलेले आहे. परमेश्वराच्या कृपेने त्यापैकी तब्बल २५ वर्षे मंत्रीपद भूषवित आहे. एवढ्या प्रदीर्घ वाटचालीत सबंध कोल्हापूर जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्राला हसन मुश्रीफ काय आहे, हे माहित आहे.
कोल्हापूर शहराच्या पाणीटंचाईकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले, या आधी पालकमंत्री असताना मी कोल्हापूर शहराच्या प्रश्नांच्या संदर्भात बैठका घेत होतो. परंतु; अलीकडच्या काळात मी शहराच्या प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती घेतलेली नाही. परंतु; महायुतीचा घटक म्हणून नक्की लक्ष घालेन. कोल्हापूर शहरात नवीन नियुक्त झालेले आयुक्त राजेंद्र भारूड हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. काही दिवसातच महानगरपालिकेच्या सर्व सेवा सुरळीत होतील, याची ते काळजी घेतील.’