ज्या शिवाजी विद्यापीठाने मला घडविले, त्या मातृसंस्थेचे ऋण फेडणे हीच मोठी जबाबदारी - डॉ. आर. के. कामत
schedule22 May 26 person by visibility 108 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘ज्या शिवाजी विद्यापीठाने मला घडवले, त्या मातृसंस्थेचे ऋण फेडणे ही आता माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे. विद्यापीठाला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अधिक सक्षम, तंत्रज्ञानाभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित बनवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करू, ’असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी शुक्रवारी, २२ मे २०२६ रोजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारलीडॉ. कामत यांनी सकाळी कुलगुरू निवासस्थानापासून विद्यापीठाच्या प्रांगणामधील सर्व प्रवास इलेक्ट्रीक वाहनातून केला. विशेष म्हणजे या वाहनाचे सुकाणू त्यांनी स्वतःच हाती घेतले होते. कामत यांनी महामानवांना अभिवादन केले. दरम्यान सायंकाळी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात वारणा समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. कामत यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठाशी असलेले भावनिक नाते अधोरेखित केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने दिलेल्या प्रशिक्षणामुळेच विविध ठिकाणी काम करताना आव्हानात्मक परिस्थितीतही यशस्वीपणे कार्य करता आले.शिवाजी विद्यापीठाला महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक समावेशकता, ज्ञान, संशोधन आणि समाजाभिमुख शिक्षण यांचा समन्वय साधण्याची भूमिका मांडली.
डॉ. दिगंबर शिर्के यांनी नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचे अभिनंदन करताना म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक म्हणून विविध स्तरांवर कार्य केलेली व्यक्ती आज या विद्यापीठाचे नेतृत्व स्वीकारत आहे, हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आपल्यापेक्षा अधिक सक्षम आणि व्यापक अनुभव असलेले नेतृत्व मिळणे आवश्यक असते. तसे नेतृत्व शिवाजी विद्यापीठाला डॉ. कामत यांच्या रुपाने मिळाल्याचा आनंद वाटतो. यावेळी डॉ. जी.बी. कोळेकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. सागर डेळेकर, प्रा. शंकरराव कुलकर्णी, डॉ. डी.आर. मोरे, डॉ. निखिल गायकवाड, तेजस्विनी गोरनाळे, धैर्यशील यादव, माजी कुलगुरू प्रा. एस.एच. पवार आणि नाथाजी शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नंदिनी पाटील आणि धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी आभार मानले. यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील उपस्थित होते.
स्वागतासाठी येणे टाळण्याचे आवाहन
सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आवाहनाचा उल्लेख करत डॉ. कामत यांनी स्वागतासाठी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले. “फोन, ई-मेल किंवा शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केलेले प्रेमही तितकेच महत्त्वाचे आहे. इंधन, वेळ आणि राष्ट्रीय संसाधनांची बचत ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.