महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गावामध्ये ना डॉल्बी,ना चौकात डिजिटल फलक ! सार्वजनिक रस्त्यावर रात्री-अपरात्री वाढदिवस करुन फटाके वाजविण्यावर बंदी !! सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राहावी यासाठी ही आचारसंहिता बनविली आहे, हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने. विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतींने गावातील शांतता व सलोख्यासाठी नऊ नियम तयार केले आहेत. हे नियमावली सगळयासाठी बंधनकारक असून त्याचे उल्लघंन केल्यास संबंधितांचे खासगी नळ कनेक्शन एक वर्षासाठी बंद करण्याचा ठरले आहे. तसेच घरफाळामध्ये पाच हजार रुपयांचा दंड आकारुन वसूल करण्याचा ठराव मंजूर केला.
नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात माणगाव ग्रामपंचायतीचा हातखंडा. विविध लोकोपयोगी उपक्रमांची अंमलबजावणी करण्यातही ग्रामपंचायत अग्रेसर. दरम्यान १२ मे रोजी मोबाइलवरील स्टेटसवरुन दोन समाजात वादावादी झाली. गावातील शांतता व सलोख्याला धक्का पोहोचला. या प्रकाराची गंभीर दखल ग्रामपंचायतींनी घेतली. सरपंच राजू मगदूम व अन्य सदस्यांनी एकत्र येत गावची शांतता व सामाजिक सलोखा कायम टिकला पाहिजे यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना आखण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये संपूर्ण गावाला सामील करुन घ्याययचे ठरले. १७ मे रोजी ग्रामसभा बोलाविण्यात आली.
या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा होऊन पुढील ठराव मंजूर केले. यामध्ये, ‘गावामध्ये सामाजिक सलोखा व शांतता निर्माण होण्यासाठी कडक निर्बंध आणणे सर्वधर्मिय शांतता कमिटी स्थापन करणे. गावामध्ये धार्मिक-सामाजिक-राजकीय कार्यक्रम व वाढदिवसानिमित्त डिजीटल बोर्डवर बंदी घालण्याचा ठरावही करण्यात आला. तसेच गावामध्ये डॉल्बी लावणे पुंगळया काढून गाडया पळविणेवर बंदी घालण्याचा निर्णय झाला. गावातील सार्वजनिक रस्त्यावर खडूने अथवा चॉकपिटने नवीन वर्षाच्या स्वागताचे शुभेच्छा संदेश लिहिण्यास बंदी करण्यात आली. सार्वजनिक रस्त्यावर रात्री-अपरात्री वाढदिवस करुन फटाके वाजविण्यावर बंदी घालण्यात आली. रात्रीच्या वेळी सार्वजनिक रस्त्यावर खेळ खेळण्यास बंदी आणली.
‘जयंती-पुण्यतिथी-यात्रा, उरुस यावेळी ग्रामपंचायत व पोलिस पाटील, पोलिस स्टेशनची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल असे स्टेटस व मेसेज व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकवर लावल्यास व त्या पाठविल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायतीतर्फे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय ग्रामसभेने मान्य केला. गावांत शांतता अबाधित ठेवण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर अथवा वैयक्तिक चौकामध्ये धार्मिक झेंडे लावल्यास त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करुन शांतता भंग केल्याचा गुन्हे दाखल करण्याचा ठराव मंजूर झाला.. हे सर्व निर्णय सर्वांसाठी बंधनकारक असतील. या निर्णयांचा कोणी भंग केल्यास संबंधितांचे खासगी नळ कनेक्शन एक वर्षासाठी बंद करण्याचा ठरले आहे. तसेच घरफाळामध्ये पाच हजार रुपयांचा दंड आकारुन वसूल करण्याचा ठराव मंजूर केला.’अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली आहे. दरम्यान ग्राामसभेत मांडलेल्या ठरावांचे सूचक अनिल संभाजी जगदाळे, नंदकुमार बंडू शिंगे आहेत. अनिल नरसगोंडा पाटील, दादासो आण्णा वडर हे अनुमोदक आहेत. ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी, उपविभागीय कार्यालय इचलकरंजी, तहसिलदार ऑफिस व पोलिस स्टेशन हातकणंगले यांना कळविले आहे