गल्लीतील भांडणसारखे दोन गटनेते महापालिकेत भिडले ! शारंगधर देशमुख - आदिल फरासांत पुन्हा घमासान ! !
schedule18 Mar 26 person by visibility 516 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरुन सर्वसाधारण सभा गाजली. कोल्हापूर शहरालगतच्या गावातील ज्या भागामध्ये पाणी पुरवठा होतो, त्यावर चर्चा सुरू असताना शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाचे गटनेते आदिल फरास यांच्यामध्ये वाद घडला. शाब्दिक बाचाबाची वाढत जाऊन दोघांनीही एकमेकांना उद्देशून बघून घेतो अशी भाषा वापरली. चौकात चल, दाखवतो इतक्या टोकापर्यंत हा वाद वाढला. एकमेकांकडे पाहत शडडू ठोकण्याचा प्रकारही घडला. अन्य पदाधिकारी व नगरसेवकांनी मध्यस्थी करुनही दोघेही शांत बसायला तयार नव्हते. अखेर महापौर रुपाराणी निकम यांनी दोघांनाही समज दिली. मात्र या कालावधीत सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमारे विविध प्रकारच्या करवाढीचे प्रशासकीय प्रस्ताव होते. यामध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढीसंदर्भातील प्रस्ताव होता. मात्र सर्वच नगरसेवकांनी करवाढीला प्रचंड विरोध केला. प्रशासकीय राजवटीत कोणत्याही प्रकारची करवाढ केली नाही आता करवाढीचा अट्टाहास कशासाठी असा सवाल करत नगरसेवकांनी प्रशासनाला कोंडीत पकडले. घरफाळा, पाणीपट्टी, पाणी पुरवठा, शहरातील पथदिवे यासह नागरी सुविधावरुन गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास, मुरलीधर जाधव, राजेश लाटकर, विशाल शिराळे दुर्वास कदम, विजयेंद्र माने, अभिजीत खतकर, विजय देसाई, माधुरी नकाते, दीपा ठाणेकर, पल्लवी देसाई, विजय खाडे, वैभव माने, स्वरुप कदम, अश्किन आजरेकर, जयश्री चव्हाण, रत्नेश शिरोळकर, अर्जुन माने, मंगल साळोखे, पूर्वा राणे, अमर समर्थ, सुनील मोदी नियाज खान यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला. सभागृहाच्या संतप्त भावना लक्षात घेत, महापौर निकम यांनी, कोणत्याही प्रकारच्या करवाढीला सभागृहाचा सक्त विरोध आहे.घरफाळा व पाणीपट्टी वाढ होणार नाही असे स्पष्ट केले. त्याचवेळी कोल्हापूर महापालिका क वर्गमधून अ वर्गमध्ये समाविष्ठ होण्यासाठी प्रयत्नशील आहे. महापालिकेचे उत्पन वाढीसाठी पर्याय शोधले पाहिजेत अशी सूचना केली. तसेच घरफाळा व पाणी पुरवठासंदर्भात एक एप्रिल 2026 रोजी बैठक घेण्याचे महापौर यांनी स्पष्ट केले.
सभेत शहरालगतच्या ग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून महापालिकेचे उत्पन्न वाढावे हा सदस्य ठराव चर्चेला आला. गटनेते देशमुख व नगरसेवक विजय देसाई यांनी हा ठराव मांडला होता. त्यावर नगरसेवक फरास यांनी शहरालगतच्या ग्रामीण भागात ज्या ठिकाणी महापालिकेचे नळ कनेक्शन आहेत, ते खंडित करावेत आणि शहरवासियांना पाणी पुरवठा करावा असे सांगितले. यावर नगरसेवक देशमुख यांनी शहरालगतच्या ग्रामीण भागात नळ कनेक्शन असलेल्या ठिकाणी महापालिकेकडून रितसर पाणीपट्टी आकारणी होत असेल तर उत्पन्नात भर पडणार आहे. जिथं पाणीपट्टी आकारणी होत नाही तिथं महापालिकेने कार्यवाही करुन पाणी बिलाची आकारणी करावी अशी सूचना केली. यावरुन फरास व देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक वाद वाढत गेला. दोघांनीही एकमेकांला बघून घेण्याची भाषा वापरली.
फरास यांनी देशमुख यांना उद्देशून, ‘कुणी आम्हाला शहाणपण शिकवायची गरज नाही. बाहेरच्या जिल्हयातून येऊन नेतृत्व करणाऱ्यांनी आम्हाला काही सांगू नये.’ त्यावर देशमुख यांनीही तितक्याच ताकतीते उत्तर दिले. यावर देशमुख यांनी विषयपत्रिकेवरील विषयावर चर्चा घडावी, अवांतर विषय मांडू नयेत.प्रत्येकवेळी तेच ते किती ऐकून घ्यायचे. विषयपत्रिकेवर अन्य विषयही आहेत.’ असे सुनावले. तेव्हा फरास यांनी ‘दादागिरी चालणार नाही. आमच्या तीन तीन पिढया प्रतिनिधीत्व करत आहेत. खाली चौकात या दाखवितो’अशी भाषा वापरली. त्यावर देशमुख यांनी संतप्त होत, ‘मराठयांची औलाद हाय, चल चौकात येतो.’असे प्रतिउत्तर दिले. स्थायी समिती सभापती शिराळे, नगरसेवक शिरोळकर, सभागृह नेते जाधव, ऋतुराज क्षीरसागर, विजय जाधव यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र दोघेही गटनेते एकमेकांना उद्देशून मोठमोठयाने बोलत असल्याने सभागृहात प्रचंड गोंधळ वाढला. महापौरांनी, दोघांनाही समज देत सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरळीत केले.