महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान विकासासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर परिसरातील जमीन अधिग्रहण करण्यासंबंधीच्या नोटीस नागरिकांना पाठविले आहेत. दरम्यान मंदिर परिसरातील मिळकतधारक व दुकानदारांनी समितीने जमीन अधिग्रहण करण्यापेक्षा तीन पर्यायांचा विचार करावा असे सुचवत विरोधाचा सूर आळवला आहे.माजी नगरसेवक अजित ठाणेकर, महाद्वार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण नकाते व कार्याध्यक्ष जयंत गोयाणी यांनी पत्रकार परिषद घेत, देवस्थान समितीने लोकांच्या जमिनी अधिग्रहण करण्यापेक्षा कपिलतीर्थ मार्केटमधील जागेचा विकास, शेतकरी सहकारी संघाची इमारत ताब्यात घेणे व उपलब्ध साधन सामग्रीद्वारे भाविकांना सुविधा निर्माण करून देणे या पर्यायांचा गांभीर्याने विचार करावा. मंदिर विकासासाठी रहिवासी जागा देण्यास सहमती नसल्याची पत्रे नागरिकांनी देवस्थान समितीला दिलेले आहेत अशी माहिती दिली.
देवस्थान समितीने जमीन अधिकाऱ्यांच्या नोटिसा काढल्या परंतु त्या उपलब्ध जागेचा कशा पद्धतीने विकास करणार, याचा कसलाही आराखडा नाही. जमीन अधिग्रहण करण्यासाठी आवश्यक निधीही समितीकडे नाही. लोकांना राहत्या जागेवरुन हटवून व बाजारपेठेला धक्का पोहोचून काय साध्य होणार असा प्रश्न नागरिकांनी केला. मंदिर परिसरातील जवळपास 500 रहिवासी व दुकानदारांना देवस्थानच्या विकासासाठी जमिनी ताब्यात द्याव्यात अशी पत्रे देवस्थान समितीने पाठविले आहेत. देवस्थान समितीच्या या प्रस्तावाला नागरिकांचा विरोध होत आहे. परिसरातील नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची भूमिका स्पष्ट केली.
अजित ठाणेकर व किरण नकाते म्हणाले, मंदिर परिसरात 500 हून अधिक व्यावसायिक आहेत. प्रत्येक व्यवसायाकडे किमान चार जण नोकरी करतात. 2000 जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या परिसरात आहे. येथील बाजारपेठेवर परिणाम झाल्यास कोल्हापूरच्या मार्केटला धक्का बसू शकतो. कारण महाद्वारा रोड हे कोल्हापूरचे सर्वात जुनी व मध्यवर्ती बाजारपेठ आहे. हे बाजारपेठ नष्ट केल्यास अथवा इतरत्र हलवण्याचा प्रयत्न झाल्यास कोल्हापूर शहराच्या एकूण अर्थकारणातील परिणाम होऊ शकतो. मंदिरात येणाऱ्या भाविकांचा मोठा ओघ पूर्व दरवाजातून येत असतो. नवरात्र उत्सव कालावधीत तात्पुरता मांडव घालून भाविकांची सोय केली जाते. नवीन सुविधा करायच्या झाल्यास प्रशासनाने शेतकरी सहकारी संघाचे इमारत आणि फरासखाना म्हणून प्रसिद्ध असलेली इमारत या दोन्ही अधिगृहीत करून सोयी सुविधेसाठी विचार करावा. मंदिराच्या जवळच महापालिकेच्या मालिकेची कपिलतीर्थ मार्केट आहे. दीड एकर पेक्षा अधिक जागेत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून सुनियोजित विकास केल्यास तेथे आहे त्याच ठिकाणी भाजी मंडई आत्ताचे दुकाने ठेवून फेरीवाला मार्केट, प्रसादालय, मोठे पार्किंग भक्तनिवास अशा विविध सुविधा निर्माण करता येऊ शकतील. पत्रकार परिषदेला महाद्वार व्यापारी असोसिएशनचे मनोज बहिरशेठ, प्रशांत मेहता, अमित केशवानी, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे श्रीकांत लिमये, वृषाली कुलकर्णी, राम टोपकर आदी उपस्थित होते