महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी आघाडीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सासने मैदान ते सहनिबंधक कार्यालयापर्यंत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले.
राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 23 एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडी यांच्यामध्ये लढत आहे. सत्ताधारी व विरोधी आघाडीने सभासद संपर्क मोहिमेवर भर दिला आहे. दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत.
सोमवारी (२७ मार्च) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने, शशिकांत खवरे, अजय पाटील, राजकुमार पाटील, महेश चव्हाण, बाजीराव पाटील, रवीकुमार पाटील, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सतेेज पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. दरम्यान याप्रसंगी पत्रकाराशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्याच्या कारभारावरून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर जोरदार टीका केली. "राजाराम कारखानामध्ये महाडिकांची हुकुमशाही व मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे. ही निवडणूक हुकूमशाही विरोधात आहे. कोल्हापुरातील बारा हजार सभासद आणि बाहेरचे 600 सभासद् अशी लढाई आहे. कारखान्याचे प्रदीर्घकाळ नेतृत्व करत असताना महादेवराव महाडिक यांनी सभासदासाठी काय केले ? सभासदांना ऊस दर २०० रुपये कमी आहे.यामुळे यंदाच्या निवडणुकीत आमचं ठरलंय, कंडका पाडायचा.सभासदांना जादा दर मिळायला पाहिजे.कारखाना सभासदांचा असावा" ही आपली भूमिका आहे."