महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : "छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना १२२ गावातील सभासदांचा आहे. या कारखान्यात गेली सत्तावीस वर्षे नेतृत्व करताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सभासदांच्या हिताचा कारभार केला. मात्र निवडणूक जवळ आली की विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील हे हे कारखान्याविषयी खोटेनाटे आरोप करून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. खोटे बोल पण रेटून बोल ही त्यांची नीती आहे. पण राजाराम कारखान्याच्या सभासद सुज्ञ आहेत. या "सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायचंय."यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी सभासद हे सत्ताधारी आघाडीच्या सोबत असून पुन्हा एकदा सत्ताधारी आघाडीला विजयी करतील" असा विश्वास माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (27 मार्च ) हा शेवटचा दिवस होता. विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच आमदार पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कारभारावर टीका केली होती. त्या टिकेला माजी आमदार अमल महाडिक यांनी जोरदार उत्तर दिले.
"छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर टीका करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी हिम्मत असल्यास पाच प्रश्नांची उत्तरे द्यावीत. गगनबावडा येथील डॉ. डी वाय पाटील साखर कारखान्याचे एकूण सभासद किती होते ? सध्या सभासद संख्या किती आहे ? एका रात्रीत पाच हजार सभासद कमी का केले ? सभासदांना त्यांच्या हक्काची साखर मिळते का ? "या प्रश्नांची उत्तरे आमदार पाटील यांनी द्यावीत. कारखान्याच्या कारभाराविषयी कोठेही चर्चा करायला आम्ही तयार आहोत. त्यांनी अगोदर गगनबावडा येथील कारखान्याच्या कामकाजाशी बोलावे." असे खुले आव्हान माजी आमदार अमल महाडिक यांनी दिले.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कारखान्यात २७ वर्षे नेतृत्व करताना काय केले ? असा सवाल ही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता. त्या टीकेचाही माजी आमदार अमल महाडिक यांनी चांगलाच समाचार घेतला." महादेवराव महाडिक यांचे बोट धरून राजकारणात एंन्ट्री करणाऱ्या सतेज पाटील यांनी त्यांच्या कामकाजाविषयी बोलू नये. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कारखान्याचे नेतृत्व करताना सभासदांना न्याय दिला. तसेच कारखाना हा सभासदांचा ठेवला, त्याचे खाजगीकरण केले नाही. शेतकरी सभासदांना सन्मानाची वागणूक दिली. मात्र सतेज पाटील हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सभासदांची दिशाभूल करत आहे. महाडिक यांची कर्मभूमी कोल्हापूर आहे. महाडिक यांच्यावर जिल्ह्याने भरभरून प्रेम केले. त्याची जाणीव ठेवून महाडिक कुटुंब सदैव येथील लोकांना, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते."
अमल महाडिक म्हणाले, "राजाराम कारखाना हा साडेसात तालुक्यातील १२२ गावातील सभासदांचा आहे. कारखान्याचे सभासद हे सत्ताधारी आघाडी सोबत आहेत. सतेज पाटील यांना कारखान्याचे सभासद नेमके किती हे सुद्धा माहित नाही. ते बारा हजार विरुद्ध सहाशे सभासद अशी लढाई असल्यास सांगत आहेत. मात्र महाडिकांनी कारखाना कार्यक्षेत्रातील 122 गावातील सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. येत्या पाच वर्षांमध्ये इथेनॉल प्रकल्प, डिस्टलरी प्रकल्प कार्यान्वित करू. २०१८-१९ मध्ये कारखाना विस्तारीकरण आणि इथेनॉल प्रकल्पाला मान्यता मिळाली. सध्या कारखानाचे बाय प्रॉडक्ट नाहीत. मात्र कारखाना व्यवस्थापनाने नेहमीच शेतकऱ्यांना चांगला दर देण्याला प्राधान्य दिले. आगामी काळातही सभासद हिताचे कामकाज करू."असेही अमल महाडिक यांनी सांगितले.
"कारखान्याचा कारभार हा सगळ्या घटकांना सोबत घेऊन सुरू आहे. हुकूमशाही पद्धतीने कामकाज सुरू असते ही विरोधकांची टीका निरर्थक आहे. तसा एक तरी प्रसंग विरोधकाने दाखवावा"असेही महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी आमदार महादेवराव महाडिक, विद्यमान चेअरमन दिलीप पाटील, माजी चेअरमन शिवाजीराव पाटील, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, मुडशिंगीचे तानाजी पाटील, भास्कर शेटे आदी उपस्थित होते.