९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात !
schedule08 Jun 25 person by visibility 125 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्यात आली. साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाकडे चार ठिकाणाहून निमंत्रणे होती. चारही ठिकाणच्या पाहणीनंतर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी (८ जून २०२५) पुण्यात बैठक झाली. यामध्ये ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद साताऱ्याला मिळाल्याचे जाहीर केले.
साहित्य महामंडळाच्या संमेलन स्थळ निवड समितीने, त्या निमंत्रणानुसार इचलकरंजी येथील पंचरत्न मंगल कार्यालय, शरद इन्स्टिटयूट येथे पाहणी केली होती. तसेच सांगली जिल्ह्यातील औदुंबर आणि कोल्हापुरातील स्थळांची पाहणी केली. सातारा येथील मराठी साहित्य परिषद शाहूपुरी शाखा मराठी साहित्य संमेलनासाठी आग्रही होती. संमेलन स्थळ निवड समितीने शुक्रवारी इचलकरंजीत दोन ठिकाणी भेटी दिल्या.
शनिवारी सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल परिसराची पाहणी केली. संमेलन स्थळ निवड समितीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, मराठवाडा साहित्य परिषदेचे रामचंद्र काळुंखे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ यांचा समावेश होता. या समितीने। सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुरुची या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी, संयोजक यंदाचे साहित्य संमेलन घेण्याचा मान साताऱ्याला मिळावा अशी आग्रही मागणी करण्यात आली होती.