महावितरणला ग्राहकांकडून तक्रारींचा झटका ! ऊर्जा दरबारात चुकीच्या कामकाजावर प्रकाशझोत !!
schedule10 Jun 25 person by visibility 36 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कधी वाढीव वीज बिले तर कधी मीटर दुरुस्तीकडे डोळेझाक…ग्राहकांनी तक्रार करुनही त्याकडे साफ दुर्लक्ष…नवीन वीज कनेक्शनसाठी हेलपाटा…यामुळे त्रस्त बनलेल्या नागरिकांनी ऊर्जा दरबारात महावितरणच्या चुकीच्या कामकाजावर प्रकाशझोत टाकला. ग्राहकांनी पुराव्यासहित तक्रारींचा सपाटा महावितरणला चांगलाच झटका दिला. लोकभावना विचारात घेत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ‘मनमानी चालणार नाही’अशा शब्दांत तराटणी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये ऊर्जा दरबार झाला. याप्रसंगी पालकमंत्री आबिटकर यांनी, ‘महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती जनता दरभार घेतले ?’असा सवाल करत अधिकाऱ्यांची कोंडी केली. कामकाजात सुधारणा करा, तालुका स्तरावर ग्राहक मेळावे घेऊन तक्रारी दूर करा. वीज बिल दुरुस्तीसाठी शिबिरे घ्या. आणि येत्या महिन्याभरात अहवाल द्या’असा सज्जड दमही भरला. आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता जी. एम. लटपटे, महापारेषणच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांच्यावतींने सौरऊर्जेऐवजी पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांना वीज पुरवठा करावा. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सौरऊर्जेचे कनेक्शन परवडणारे नाही’अशा आशयाचे निवदेन दिले.
तत्पूर्वी ऊर्जा दरबारात ऑनलाइन ९१ तर प्रत्यक्ष ९८ असे एकूण १८९ ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या. चुये येथील अशोक पाटील यांनी इस्पुर्ली, चुयेतील शेतघरातील बंद केलेल्या वीज पुरवठयाकडे लक्ष वेधले. राधानगरीतील किरण हुपरीकर यांनी साडेसात एचपीपर्यंतच्या शेतीपंपाच्या वीज बिल माफीचा मुद्दा मांडला. हुपरीतील अरुण यादव यांनी स्मार्ट मीटर सक्तीने बसविले जात असल्याचे निदर्शनास आणले. कावणेतील जयवंत घाटगे यांनी विद्युत पंपावर वीज कनेक्शन नसतानाही आजतागायत बिलाची आकारणी सुरू असल्याचे सांगितले. ऊर्जा दरबारात कंत्राटी कामगारांच्या पगाराचा मुद्दा उपस्थित झाला. यावर पालकमंत्री आबिटकर यांनी, कंत्राटी कामगारांचा पगार न देणाऱ्या एजन्सीवर कारवाई करा असे आदेश दिले.