शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखेंच्या संकल्पनेतील शिक्षकच चांगला समाज घडवू शकतो-मंत्री पंकज भोयर
schedule08 Aug 25 person by visibility 135 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील नावलौकिक असलेली शिक्षण संस्था आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यातील बहुजन समाजापर्यंत शिक्षण् पोहोचले. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. विद्यार्थ्यांना बहुज्ञानशाखीय शिक्षणाला सामोरे जावे लागणार आहे. या अस्वस्थ वर्तमानाच्या काळात बापूजींच्या विचारांचे स्मरण आणि अंगीकार करायला हवा, बापूजींना अभिप्रेत व त्यांच्या संकल्पनेतील शिक्षकच चांगला समाज घडवू शकतो.’ असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केले.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३८ व्या स्मृतिदिन निमित आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते, कवीअविनाश भारती यांनी ‘आजची संस्कृती व डॉ.बापूजी साळुंखे यांची विचारधारा’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी, ‘ शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रार्थनेमध्ये मानवतावादी दृष्टी पाहायला मिळते. बापूजींनी सांगितलेला ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार’ हा ध्येयवाद सर्वानी आचरणात आणून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत योगदान द्यावे. बापूजींच्या सत्य्, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणूकीस आळा या पंचसुत्रीचा अवलंब करुन विद्यार्थ्यांनी आपला व संस्थेचा नावलौकिक वाढवावा. ’असे नमूद केले.
कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे म्हणाले, ‘शिक्षणातील संधी आणि आव्हाने ओळखून बापूजींनी शिक्षण क्षेत्रात अव्याहत कार्य केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना शिक्षकांनी सजग असणे गरजेचे आहे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यावर स्वार होण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारले पाहिजे आणि समाजाभिमुख शिक्षणावर भर दिला पाहिजे. या बापूजींच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने शिक्षकांनी बापूजींच्या विचार व कार्याचा वारसा आत्मसात करुन विद्यार्थी घडवावेत. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी प्रास्ताविक येले. संस्थेचे सहसचिव (प्रशासन) सिताराम गवळी यांनी आभार मानले. डॉ. कविता तिवडे, प्रा. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश पाटील, संस्थेचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे, संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार उपस्थित होते.
...........
तीन कॉलेजचा सत्कार, पुस्तक प्रकाशन
संस्थेतील गुणवंत विद्यार्थी व शाळा सिध्दी मुल्यमापन अंतर्गत विजेते म्हणून प्रथम क्रमांक विवेकानंद कॉलेज,कोल्हापूर, व्दितीय क्रमांक राजे रामराव महाविद्यालय जत, तृतीय क्रमांक पद्मभुषण डॉ.वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव यांचा सत्कार करण्यात आला. पाल येथील कलाशिक्षक विजयकुमार पांडुरंग शिंगण यांनी साडेचार एकर परिसरात शिवराज्याभिषेक संबंधी रांगोळी काढून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. डॉ.मच्छिंद्र नांगरे लिखीत ‘शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे विचारधन’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.