महावितरण घेणार सर्व जिल्हाभर ग्राहक मेळावे
schedule08 Aug 25 person by visibility 37 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महावितरणतर्फे महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी सकाळी दहा ते दुपारी दीड या वेळेत पशाखा कार्यालय स्तरापर्यंतचे ग्राहक मेळावे घेणार आहे. तसेच सोमवारी शासकीय सुट्टी असेल तर पुढील दिवशी म्हणजेच मंगळवारी ग्राहक मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. ग्राहकांनी सदरच्या ग्राहक मेळाव्या मध्ये सहभागी होऊन आपले तक्रार अर्ज सादर करणेबाबत आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे. याची सुरुवात या महिन्याच्या दुसऱ्या सोमवार (दि.११ ऑगस्ट) पासून होणार आहे.
महावितरणतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व सुविधांच्या अनुषंगाने ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्या तक्रारीचे निरसन वेळेत करण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत उपविभागीय स्तरापर्यंतचे ग्राहक मेळावे घेण्याचे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले होते. त्यानुसार महावितरणने जुलै महिन्यात घेतलेल्या मेळाव्याचा लाभ जिल्ह्यातील ६१२ ग्राहकांनी घेतला होता. यामुळे पालकमंत्री आबिटकर यांनी समाधान व्यक्त केले. ग्राहक मेळाव्यात ग्राहकांच्या विविध शंकांचे निरसन प्रात्यक्षिकांसह करण्यात येणार आहे. यावेळी ग्राहकांना नवीन विद्युत पुरवठा देणे, ग्राहकांचा वीज भार वाढवणे अथवा कमी करणे, प्रधानमंत्री सूर्यघर सूर्य घर योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्यासाठी कुसुम बी व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी उपयुक्त योजनांची माहितीही देण्यात येईल. असे कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी म्हटले आहे.