महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे मधुरिमाराजे छत्रपती अथवा स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी अंतर्गत हा मतदारसंघ काँग्रेसला आहे. दरम्यान सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार जयश्री जाधव करत आहेत.
महायुतीकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचीउमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हा सर्वाधिक चर्चेचा विषय बंनला आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघात इच्छुकांची संख्या जवळपास आठ आहे. शिवाय मधुरीमाराजे यांचे नावे चर्चेत आहे. विद्यमान आमदार जयश्री जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, माजी नगरसेवक आर डी पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, बांधकाम व्यवसायिक आनंद माने, दुर्वास कदम यांनी काँग्रेसकडे मुलाखती दिले आहेत. मात्र अद्याप महाविकास आघाडी अंतर्गत कोल्हापूर उत्तर मधून उमेदवार निश्चित झाला नाही. काँग्रेसचे नेते सतेज पाटील व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनीही इच्छुकांशी चर्चा केली आहे . दोन दिवसात कोल्हापूर उत्तरचा उमेदवार निश्चित होईल असे सतेज पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना बुधवारी सांगितले होते.
महायुतीकडून क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित झाल्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवारी संदर्भात हालचाली वाढले आहेत. महायुतीला टक्कर देण्यासाठी सक्षम उमेदवार हवा यासाठी तगडा उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी नेते प्रयत्नशील आहेत या चर्चेमध्ये मधुरिमाराजे छत्रपती यांचे नाव आघाडीवर आहे. राजेश लाटकर यांच्या नावाभोवती चर्चा सुरू आहे. उद्योगपती तेज घाटगे यांना उमेदवारी मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र त्यांनी या संदर्भात स्पष्टपणे नकार दर्शवला आहे. घाटगे यांनी निवेदनात म्हटले आहे, "येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस पक्षाच्या वतीने माझी उमेद्वारी निश्चित झाल्याबद्दलचे मेसेजीस व्हायरल होत आहेत. यामध्ये अजिबात तथ्य नाही. सर्वांना विनंती आहे की कोणीही या अफवेवर विश्वास ठेवू नये. " दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे गुरुवारी मुंबईकडे रवाना झाले. यामुळे कोल्हापूर उत्तराचा निर्णय आता वरिष्ठ पातळीवरून होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.