शक्तीपीठ महामार्गावरुन नेत्यांच्यामध्ये वाकयुद्ध ! राजू शेट्टी, सतेज पाटलांचा सवाल, राजेश क्षीरसागरांचे आव्हान !!
schedule13 Jul 25 person by visibility 42 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरुन समर्थन आणि विरोधाचे दोन मतप्रवाह वाहत असताना आता नेते मंडळी आमनेसामने उभे ठाकले आहेत. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील व सत्ताधारी महायुतीचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. मुंबईतील बैठकीवरुन निशाणा साधताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी, ‘महामार्ग समर्थनार्थ जी बैठक झाली, त्या बैठकीतील शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जातात का ? ’असा सवाल केला. इंडिया आघाडीनेही मुंबईतील बैठकीला बाधित शेतकरी नव्हते असा हल्लाबोल केला. त्यावर आमदार क्षीरसागर यांनी पलटवार करताना, ‘मुंबईतील बैठकीला बाधित शेतकरी उपस्थित होते, मात्र सतेज पाटील हे जाणूनबुजून दिशाभूल करत आहेत. त्यांना आता काहींच काम उरले नाही’असा टोला लगाविला.
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात विरोधी संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी करवीरनिवासनी अंबाबाईला साकडे घालण्यात आले. स्वाभिमानीचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘शक्तीपीठ महामार्ग रद्द होऊ दे, शेती वाचू दे. शक्तीपीठ महामार्गप्रश्नी आमदार क्षीरसागर यांना अंबाबाई देवींनी सुबुद्धी दयावी,’अशा शब्दांत टीकास्त्र सोडले होते. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी, ‘शक्तीपीठ महामार्गप्रश्नी मुंबईत झालेल्या बैठकीला जे शेतकरी उपस्थित होते, त्यांच्या जमिनी जातात का ? गरज नसलेला शतीपीठ लादू नये. बैठकीला उपस्थित असलेल्या काही शेतकऱ्यांनी यापूर्वी शक्तीपीठाला विरोध केला होता. हरकती घेतल्या होत्या. सरकारने या महामार्गाविषयी फेरविचार करावा. शक्तीपीठ विरोधात आमची लढाई सुरुच राहील. बहुमताच्या रेटावर सगळे रेटून न्यायचे हे सरकारचे धोरण योग्य नाही.’
शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘शक्तीपीठ महामार्गवरुन विरोधक शेतकरी, नागरिकांची दिशाभूल करत आहेत. मुंबईतील बैठकीला महामार्ग बाधित शेतकरी उपस्थित होते. त्यांनी महामार्गासाठी सहमती दर्शविली आहे. मात्र सतेज पाटील हे खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे सध्या काही काम नाही. मंत्री, पालकमंत्री असताना त्यांनी कोल्हापूरसाठी काही केले नाही. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांना धडा शिकवला आहे. मुंबईतील बैठकीला बाधित शेतकरी उपस्थित नव्हते हे त्यांनी सिद्ध करावे, हा आरोप सिद्ध झाला तर मी राजकारणातून संन्यास घेतो. अन्यथा त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा. मला सुबुद्धी मिळावी म्हणून साकडे घालणाऱ्या विरोधकांना करवीर निवासिनी अंबाबाई देवींनी सुबुद्धी द्यावी. विकासकामात खोडा घालायचे विरोधकांनी बंद करावे. आम्ही कोल्हापूर शहर व जिल्हयाच्या विकासासाठी काम करत आहोत.’