मानवकल्याणाचा भाव जागृतीसाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज - डॉ. भूषण पटवर्धन
schedule29 Jul 26 person by visibility 29 categoryशैक्षणिक
*
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘लहान मुलांचा पोशाख, आहार आणि बोलण्यात भारत दिसत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव त्यांच्या वर्तनावर वाढत आहे. अशा काळात आपल्या परंपरा आणि संस्कृतीची शिकवण त्यांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज आहे. प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल. तिन्ही पुस्तके इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रकाशित झाली असून, लवकरच इतर भाषांमध्येही ती उपलब्ध होणार आहेत.’ असा विश्वास राष्ट्रीय संशोधक आणि शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केला.
डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ व सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पटवर्धन लिखित 'आयुर्वेद फॉर किड्स', 'योग फॉर किड्स' आणि 'जिनोम ते ओंम' या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील होते यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अनुवादक डॉ. जया कुऱ्हेकर, आशुतोष रामगीर उपस्थित होते.
डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, ‘डॉ. पटवर्धन यांच्या तिन्ही पुस्तकांत विश्वकल्याणाचा विचार आहे. पाश्चात्त्य संस्कृतीमुळे झालेले बदल आणि भारतीय संस्कृती यांच्यातील संवाद या पुस्तकांत दिसतो. विज्ञानाचा नैतिकतेने, पर्यावरणसंवर्धनासाठी आणि मानवकल्याणासाठी कसा उपयोग करता येईल, याचा चिकित्सक दृष्टिकोन या पुस्तकांतून मांडला आहे.’ कुलगुरु प्रा. राजनीश कामत म्हणाले, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग या पुस्तकांनी दाखवला आहे. परंपरा आणि आधुनिकता यांतील दरी भरून काढण्याचे काम या पुस्तकांनी केले आहे. आजच्या काळात शारीरिक आणि मानसिक ताण वाढत असून, एकाग्रता कमी होत आहे. अशा परिस्थितीत या तिन्ही पुस्तकांचे वाचन मनाला उभारी देणारा अनुभव ठरू शकतो. आशुतोष रामगीर यांनी प्रास्ताविक केले. अनुवादक डॉ. जया कऱ्हेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अजिंक्य पंडत यांनी सूत्रसंचालन केले. कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी आभार मानले.