महाराष्ट्र चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा दिमाखात, मुख्यमंत्र्यांनी केले गाव तिथे उद्योजक उपक्रमाचे कौतुक
schedule08 Jul 26 person by visibility 17 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईच्या २०२६–२०२८ या कार्यकाळातील अध्यक्ष व कार्यकारिणी मंडळाचा पदग्रहण सोहळा नुकताच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट येथे झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री पंकज भोईर, महाराष्ट्र चेंबरचे जीसी सदस्य तथा आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार प्रवीण दरेकर, बाबूराव कदम-कोहळीकर आदी उपस्थित होते.
या सोहळ्यात महाराष्ट्र चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र माणगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्षा डॉ. धनश्री हरदास, उपाध्यक्ष किरण भोसले, उपाध्यक्ष संतोष राणे, उपाध्यक्षा सौ. सुनीता फाल्गुने, उपाध्यक्ष महेंद्र अग्रवाल, उपाध्यक्ष सर्जेराव नलावडे, उपाध्यक्ष सुनील किर्दक, उपाध्यक्ष सिद्धार्थ रूहाटिया, विशेष निमंत्रित वेदांशू पाटील आणि सर्व गव्हर्निंग कौन्सील सदस्य यांनी पदग्रहण केले. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे सर कार्यवाह सुरेश घोरपडे उपस्थित होते. नूतन अध्यक्ष माणगावे यांनी अध्यक्षीय चषक स्वीकारून अध्यक्षपदाचा पदभार ग्रहण केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र चेंबरच्या ‘गाव तिथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे विशेष कौतुक करत, प्रत्येक गावात उद्योजक निर्माण करण्याची ही संकल्पना महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात उद्योजकता वाढवून रोजगारनिर्मितीला चालना देण्याबरोबरच महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हा उपक्रम मोलाचे योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.उद्योगमंत्री सामंत यांनी, महाराष्ट्र चेंबरच्या आगामी शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी सरकारचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही देत, “उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि महाराष्ट्र चेंबर यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे,” असे नमूद केले.