सचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडी
schedule03 Feb 26 person by visibility 37 categoryजिल्हा परिषद
कोल्हापूर : सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या पाटील कुटुंबीयांतील नवीन पिढीतील आश्वासक चेहरा म्हणून पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन विश्वास पाटील यांच्या उमेदवारीला मतदारांची वाढती पसंती मिळत आहे. त्यांच्या पदयात्रा, कॉर्नर सभाला मिळणारा प्रतिसाद विजयाची खात्री देत आहेत. या तरुण नेतृत्वात विकास कामाची धडाडी पाहावयास मिळत आहे अशा प्रतिक्रिया मतदारसंघातील नागरिकांच्या आहेत.
उमेदवार सचिन पाटील हे गेली काही वर्षे समाजकारण, राजकारण, सहकार व क्रीडा क्षेत्रात आहेत. गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा सामाजिक कार्याचा वारसा ताकतीने पुढे चालवित आहेत. लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी नेतृत्व गुण सिद्ध केले आहेत.जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची म्हणून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्येक गावाचा दौरा केला आहे. घर टू घर संपर्क साधला. त्यांची विकासकामाची धडपड, मतदारसंघासाठी काम करण्याची तळमळ, संघटन कौशल्य पाहून शिवसेनेने या तरुण नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. पाडळी खुर्द हा जिल्हा परिषदेचा नवीन गट आहे. या मतदारसंघात ३५ हजारांहून अधिक मतदार. जवळपास चौदा गावे. पाडळी खुर्द, शिरोली दुमाला, वाशी, वाडीपीर, शेळकेवाडी, नंदगाव, कोगे, महे, बीड, आरे, धनगरवाडी, सावरवाडी, सडोली खालसा, हिरवडे दुमाला या गावांचा समावेश आहे. शिवसेनेने ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहेत. आमदार नरके यांच्या उपस्थितीमध्ये कसबा बीड येथे जंगी सभा झाली. गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांना मानणारा या मतदारसंघात मोठा वर्ग आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील काम, करवीर पंचायत समिती, कारखानदारी आणि दूध संघ या माध्यमातून सामान्य लोकांशी त्यांची नाळ जुळली आहे.
उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ गावनिहाय नियोजन केले आहे. वैयक्तिक संपर्कावर भर आहे. प्रचारफेरी काढण्यात येत आहेत. उमेदवार सचिन पाटील हे मतदारांना प्रत्यक्ष भेटून निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅप त्यांच्यासमोर मांडत आहेत. भागातील मतदारांच्या आशा -आकांक्षा, तरुणांच्या अपेक्षा जाणून मतदारसंघाचा संपूर्ण विकासाची रुपरेषा त्यांनी तयार केली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेद्वारे मतदारसंघातील नागरिकांचे जीवनामान उंचावण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे. त्यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद हा विजयाची खात्री देत असल्याचे मतदारच सांगत आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि विकासात्मक दृष्टीकोन ठेवून काम करणाऱ्या तरुण नेतृत्वाची भागाला गरज आहे. सचिन विश्वास पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघाला हक्काचा उमेदवार मिळाल्याची मतदारांची भावना बनली आहे.