महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी आदराची भावना आहे. शाहू महाराज जनतेच्या सुखदुःखात सामील होणारे व्यक्तिमत्व आहे. हजारो शेतकरी ज्यावेळी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते त्यावेळी कसलाही विचार न करता शाहू महाराजांनी आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता याची आम्हाला जाणीव आहे. यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार द्यायचा की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल." अशी स्पष्ट ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
राजू शेट्टी हे शुक्रवारी कोल्हापुरात आले असता पत्रकाराशी बोलत होते. हातकणंगले मतदारसंघात त्यांच्या विरोधात महायुतीकडून रोज नवनवीन नावेसमोर येत आहेत. या संदर्भात प्रश्न विचारला असता राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर लढण्यावर मी ठाम आहे. मी स्वतंत्रपणे लढणार आहे. माझ्या विरोधात कोण उमेदवार असणार याची मला चिंता करायची गरज नाही. जनतेचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे माझ्याकडे जनतेचा बॉण्ड आहे, इलेक्ट्रोल बॉण्ड नाही अशा शब्दात शेट्टी यांनी भूमिका मांडली. हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी शेट्टी यांच्यावर धरसोडपणाची टीका केली होती. त्या टिकेचाही शेट्टी यांनी समाचार घेतला.
शेट्टी म्हणाले, "महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींच्याकडून मला निमंत्रण होते. परंतु मी स्वतंत्र लढणार आहे. संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने तसा निर्णय घेतलेला आहे. यावरून आमचा ठामपणा दिसून येतो. धरसोडवृत्ती नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. प्रचाराची दुसरी फेरी आता सुरू आहे. लोक स्वतःहून मला निवडणुकीसाठी मदत करत आहेत. जनतेचा हा विश्वासाचा बॉण्ड हीच माझ्या विजयाची खात्री आहे. मतदारसंघात एक जाहीर सभा घेतली आहे. महाविकास आघाडीने मला पाठिंबा द्यायचा की काय त्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. मी स्वतंत्रपणे लढणार आहे."
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर त्यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये चांगले काम केले आहे. शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात त्यांनी जनतेच्या हिताचा निर्णय घेतला म्हणून त्यांना अटक झाली असावी असा टोलाही शेट्टी यांनी भाजप सरकारला लगावला.