महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कुरुंदवाड येथे सांगलीतील आरटीआय कार्यकर्ते संतोष विष्णू कदम ( वय ३६, रा. गावभाव , सांगली) यांच्या निर्घृण खुनाचा तपास करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी सांगलीतील दोन संशयीतांना अटक केली आहे. नितेश दिलीप वराळे (वय ३० रा. सिद्धार्थ नगर सांगली) आणि सुरज प्रकाश जाधव (२१, रा.गावभाग सांगली) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहत. तिसरा संशयित तुषार भिसे याचा पोलिस शोध घेत आहे .
कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर गुरुवारी एका शेताजवळ मोटारीत रक्ताने माखलेल्या अवस्थेतील एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तपास केला असता सांगलीतील माहिती अधिकारी कार्यकर्ते संतोष विष्णू कदम यांचा खून झाल्याचे घटनास्थळी दिसून आले. याप्रकरणी संतोष कदम यांच्या पत्नी प्रज्ञा यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचा आदेश दिला होता पोलीस अधीक्षक पंडित यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील, इचलकरंजीचे डी वाय एस पी समीरसिंग साळवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. तांत्रिक तपासाबरोबर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता संतोष कदम हे सांगलीहून कुरुंदवाडला जाण्यासाठी मोटारीने निघाले होते. त्यांच्या मोटारीत नितेश वराळे, सुरज जाधव आणि तुषार भिसे असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी आज शुक्रवारी नितेश वराळे आणि सुरज जाधव यांना ताब्यात घेतले. नितेश वराळे आणि संतोष कदम यांच्यामध्ये आर्थिक कारणावरून वाद होता अशी माहिती तपासात पुढे आली आहे.