महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने संघटित गुन्हेगारांच्यावर कडक पावले उचलली. सांगलीच्या सागऱ्या पवार या आंतरजिल्हा गॅंगवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. सागऱ्या पवार गँगकडून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीद्वारे दहशत माजवली जात आहे. या टोळीच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, प्राणघातक शस्त्राने हल्ले असे १५ गुन्हे दाखल झाले आहे. या टोळीच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करावी असा आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला होता. या टोळीच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे नोंद आहेत. कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र फडणीस यांनी या टोळीच्या विरुद्ध मोक्का प्रस्ताव इचलकरंजी पोलीस उपाधीक्षक समीरसह साळवे यांच्याकडे पाठवला.
हा प्रस्ताव गडहिंग्लज अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मोक्याची कारवाई करावी असा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी पोलीस अधीक्षक पंडित यांनी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यांनी मोक्कातंर्गत कारवाई करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार या टोळीतील सागर अरविंद पवार (रा. विटा, सांगली) राहुल किरण भांबिरे, पवन नागेश कित्तुरे (दोघे रा. कुरुंदवाड, या.शिरोळ) शहाजान अल्लाबक्ष पठाण (रा. इचलकरंजी ), अनिकेत दत्तात्रय ढवणे, तुषार तुकाराम भारंबड, रोहन किरण जावीर, रितेश विकास खरात, सोहम माणिक ठोकळे (सर्व रा. विटा, तालुका खानापूर जिल्हा सांगली) यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीने व्यापारी उद्योजक व्यावसायिक सर्वसामान्य नागरिकांना धमकावले असण्याची शक्यता आहे या टोळीने जर त्रास दिला असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केली आहे.